-माधव विद्वांस
लेखक, संपादक, कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक नारायण हरी आपटे यांचे आज पुण्यस्मरण. नारायण हरी आपटे (समडोळी, सांगली) व हरी नारायण आपटे (पारोळा, जळगाव) ही दोन प्रसिद्ध साहित्यिक व्यक्तिमत्त्वे आहेत. नारायण ह. आपटे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील समडोळी या गावी 11 जुलै 1889 रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण समडोळी आणि माध्यमिक शिक्षण न्यू.इंग्लिश स्कूल सातारा येथे झाले. ते शिक्षणानंतर साताऱ्या जवळील कोरेगाव येथे स्थायिक झाले. इंग्रजांची नोकरी करावयाची नाही, असे ठरवूनच केवळ लेखनावर व मुद्रणालयावर चरितार्थ करायचे, असे त्यांनी ठरविले होते. तेथे त्यांनी “आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनसंस्था स्थापन केली व त्यासाठी स्वतःचा “श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला. “किर्लोस्कर खबर’चे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून ते स्वतःचे “मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध करीत असत, तर सातारा येथून “उद्यान’, “लोकमित्र’ साप्ताहिक प्रसिद्ध करत होते.
त्यांनी कादंबरी लेखनाबरोबर लघुकथा, निबंध यासारखे साहित्यप्रकारही हाताळले. त्यांच्या नावे 70 हून अधिक पुस्तके असून त्यातील 35 हून अधिक कादंबऱ्या आहेत. त्यांनी लेखनातून अनेक सामाजिक, तसेच ऐतिहासिक विषय हाताळले. “न पटणारी गोष्ट’, “सुखाचा मूलमंत्र’, “पहाटेपूर्वींचा काळोख’, “उमज पडेल तर’, “एकटी’ या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या तसेच “अजिंक्यतारा’, “संधिकाल’, “लांच्छित चंद्रमा’ आणि “रजपूतांचा भीष्म’ या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. “आराम-विराम’ आणि “बनारसी बोरे’ हे कथासंग्रह लिहिले तसेच “गृहसौख्य’, “आयुष्याचा पाया’ या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिकनीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांचा परामर्श घेतला आहे.
त्यांची लेखनशैली प्रासादिक असली तरी सहज समजेल अशी आहे. त्यांच्या काही कादंबऱ्यांवरून चित्रपट काढण्यात आले आहेत. प्रभात या चित्रपटसंस्थेचा “कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या “न पटणारी गोष्ट’ ह्या कादंबरीवर आधारलेला आहे. त्या काळात जरठकुमारी विवाह ही ज्वलंत समस्या होती. त्या विषयाला धरून त्यांनी कादंबरी लिहिली होती.कुंकू या चित्रपटाच्या निर्मितीपासून अनेक नवी तंत्रे वापरली जाऊ लागली. शांतारामबापूंच्या कल्पक दिग्दर्शनामुळे कुंकू सिनेमा गाजला.
पार्श्वसंगीतासाठी वाद्यांऐवजी नैसर्गिक ध्वनींचा प्रयोग यावेळी करण्यात आला तसेच प्रथमच सिनेमाचा ट्रेलर दाखविण्याची पद्धत सुरू झाली.ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. या आधी त्यांच्याच “भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने “अमृतमंथन’ (1934) या चित्रपटाची निर्मिती केली. पुढे “अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती निघाली व कृष्ण थिएटरमध्ये एकोणतीस आठवडे चालली. 1942 सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवणारी “पाच ते पाच’ ही कादंबरी लिहिली होती. त्यावर आधारित “भाग्यरेखा’ हा चित्रपट आहे.
12 डिसेंबर 1933 रोजी बडोदा वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, तसेच 25 मे 1941, पुणे येथे भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वर्ष 1962 मध्ये सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ना. ह. आपटे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. त्यावेळी संमेलनाध्यक्ष बॅरिस्टर न. वि.गाडगीळ होते. त्यांचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे 14 नोव्हेंबर 1971 रोजी निधन झाले. अभिवादन.