संयुक्त महाराष्ट्राचा सूर्य उगवणारच : आ. प्र. के. अत्रे
मुंबई, ता. 28 – मुंबई-म्हैसूर सीमा वादात म्हैसूरच्या हट्टी जत्तींना पाठीशी घालून सीमेवरील मराठी माणसांवर अन्याय चालू ठेवणाऱ्या गृहमंत्री पंतांना मराठी जनतेच्या भावनांचे शांततामय पण प्रखर दर्शन घडविण्यासाठी आज येथे समितीतर्फे प्रचंड मोर्चा संघटित करण्यात आला होता. या मोर्चात 15000 लोकांनी भाग घेतला होता.
सर्वांच्या हातात काळी निशाणे होती. मोर्चा एक मैल लांबीचा होता. मोर्चा आझाद मैदानापासून सचिवालयाचे रोखाने निघाला आणि तो पोलिसांनी ओव्हल मैदानापाशी रोखला. तेव्हा तेथेच सभा घेण्यात येऊन सरकारच्या उर्मट वृत्तीचा कडक निषेध करण्यात आला. आचार्य अत्रे म्हणाले, या लोकांनी कोंबडी झाकून ठेवली तरी संयुक्त महाराष्ट्राचा सूर्य उगवल्यावाचून राहणार नाही.
सचिवालयाचा मार्ग चव्हाणांच्या पोलिसांनी अडवला तरी हा मार्ग लवकरच खुला होणार आहे. तो मार्ग रोखण्याची यांची ताकद नाही. मला मंत्री होण्याची इच्छा नाही पण समितीच्या हाती सत्ता आली नि मी झालो तर गृहमंत्री होईल आणि प्रथम महाराष्ट्रद्रोही चव्हाण-मेहता-कन्नमवारांना याच पोलिसांकरवी अटक करील.
गांधारांच्या राजधानीचे पेशावरनजीक अवशेष
लाहोर – वायव्य सरहद्द प्रांतात अडीच हजार वर्षांपूर्वी राज्य करणाऱ्या गांधारांचे पुष्कलावती राजधानीचे अवशेष पेशावरनजीक सापडले आहेत. सुप्रसिद्ध ब्रिटिश पुराणवस्तू संशोधक सर मॉर्टिमेंट व्हीलर यांनी पेशावरनजीकच्या मैदानात हे उत्खनन चालविले आहे. सर मॉर्टिमेंट हिंद सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याचे फाळणीपूर्वीच्या काळात डायरेक्टर जनरल होते.
गांधाराची पुष्कलावती राजधानी मध्य आशिया व भारत यांच्या व्यापारी मार्गावरील एक अत्यंत भरभराटलेली नगरी होती असे या उत्खननात आढळून आले आहे. त्याबाबत सर मॉर्टिमेंट म्हणतात, भारताचे प्राचीनकाळी अनेक राष्ट्रांशी निकटचे व्यापारी संबंध होते त्याचे पुष्कलावती एक स्मारक होय. या व्यापारी मार्गाने जाणाऱ्या तांड्याकडून या नगरीला उत्पन्न मिळे.
याच व्यापारीमार्गावरील पुष्कलावतीच्या दक्षिणेय शंभर मैलावर असलेल्या तक्षशिला नगरीलाही व्यापारापासून असेच उत्पन्न मिळत असे. ग्रीक सेनानी अलेक्झांडर याने इसवीसनापूर्वी 327 मध्ये पुष्कलावती शहरास वेढा दिला आणि ते जिंकण्यास त्याला एक महिना लागला होता.