भूहीन मजुरांसाठी सरकारी घर योजना : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण
औरंगाबाद, दि. 8 – भूहीन मजुरांसाठी घरे बांधण्याचे काम पूर्ण करावे, असा आदेश मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज दिला. भू-हिनांना घर बांधून देण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे. मुख्यमंत्री चव्हाण हे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मराठवाड्यात आले. चव्हाण यांनी गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्पाला भेट दिली. ज्वारीचे विक्रमी पीक पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी म्युनिसिपालिटीच्या कार्यक्रमात केले. यानंतर संत एकनाथ महाराज समाधीची पूजा केली.
चारित्र्यसंपन्न पिढीसाठी व्यासपीठ काढले पाहिजे
पुणे – नव्या पिढीला चारित्र्यसंपन्न करण्यासाठी आम्हा म्हाताऱ्या पुढारी कार्यकर्त्यांनी एखादे व्यासपीठ काढले पाहिजे व त्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समाजवादी ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांनी केले.
हृदयविकाराच्या संशोधनावर अधिक पैसा खर्च करावा
नवी दिल्ली – देशात हृदयविकार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. म्हणून सरकारने हृदयविकाराचे संशोधनावर अधिक पैसा खर्च केला पाहिजे, असे लोकसभेत सभासदांनी सुचविले. त्यावर आरोग्यमंत्री डॉ. करणसिंग यांनी सभासदांच्या चिंतेत सहभागी असल्याचे सांगितले. मात्र सध्या संशोधनावर पैसा करणे शक्य नाही.