देशात दुसरे उपग्रह संपर्क केंद्र सुरू होणार
नवी दिल्ली, दि. 21 – भारतातील दुसरे उपग्रह संपर्क केंद्र येत्या शुक्रवारी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते सुरू होत आहे. डेहराडून हृषिकेश रस्त्यावर डेहराडूनपासून तेवीस किलोमीटरवर हे केंद्र आहे. पहिले केंद्र पुण्याजवळ आर्वी येथे चालू आहे.
वृत्तपत्र कर्मचाऱ्यांचा “मागणी दिन’
मुंबई – वृत्तपत्रे व वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी आज “मागणी दिन’ पाळला. वेतन मंडळाची हंगामी वाढीची शिफारस त्वरित स्वीकारावी अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला होता.
माझे हात बळकट करा इंदिराजींचे आवाहन
शिलॉंग – लोकांनी माझे हात बळकट केल्यासच मेघालयसारख्या डोंगराळ विभागाचा वेगाने विकास होऊ शकेल, असे पंतप्रधान इंदिरा गांधी येथे म्हणाल्या. इंदिरा गांधी निवडणूक प्रचार सभेत बोलत होत्या. दारिद्य्र, भूक व वर्चस्वाविरुद्ध ऐक्याने लढा देण्यासाठी जनतेने पूर्ण निश्चयाने पुढे आले पाहिजे, असेही इंदिरा गांधी म्हणाल्या.
जनता पक्ष सत्तेवर आल्यास सर्वांना काम
बेंगलोर – जनता पक्ष सत्तेवर आल्यास घटनेचा आत्मा सुरक्षित ठेवील तसेच सर्वांना काम उपलब्ध करून देईल, असे जनता पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई म्हणाले.