अंधश्रद्धा नष्ट करण्यास साधूंनी मदत करावी
कुंभनगर, दि. 22 – शांती व समृद्धीकडे चाललेल्या राष्ट्राच्या वाटचालीत सर्व जनतेने सहभागी व्हावे, यासाठी जनतेतील अंधश्रद्धा दूर करण्यास साधूंनी मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे केले.
कुंभमेळ्यात भारत साधू समाजाच्या खास अधिवेशनात त्या भाषण करीत होत्या. घटनेत घोषित केलेली धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविरोधीपणा नव्हे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्पष्ट केले.
उपाशीपोटी तत्त्वज्ञान नको
कुंभनगर – पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, उपाशी माणसाला जीवनाची उच्च तत्त्वे समजावून सांगता येणे अशक्य आहे. जेव्हा लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, तेव्हाच त्यांस धर्म व तत्त्वज्ञानाबाबत विचार करण्यास सांगता येईल.
जीवनास अत्यावश्यक असणाऱ्या किमान गोष्टी पुरवाव्यात. या दृष्टीनेच सरकारी योजना आखण्यात आल्या आहेत. बद्री पीठाच्या शंकराचार्यांच्या नेतृत्वाखालील साधूंनी दिलेल्या आशीर्वादाचा पंतप्रधान गांधी यांनी स्वीकार केला.