तेजी-मंदीचं म्हणे चक्रं असतात..! अर्थशास्त्रात म्हटलंय की तेजीनंतर घसरण सुरू होते. हळूहळू मंदी येते. नंतर पुनरुज्जीवनाची अवस्था येते आणि मग पुन्हा तेजी येते. ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी घडते, कोणकोणते घटक त्यासाठी जबाबदार असतात, याबद्दल ज्यांना अजिबात सांगता येत नाही, तेसुद्धा तेजीनंतर घसरण आणि घसरणीनंतर मंदीच येणार, असं छातीठोकपणे सांगतात.
अर्थतज्ज्ञ तर हल्ली गल्लोगल्ली जन्माला आलेत. तेजीनंतर घसरगुंडी सुरू झाली आणि ती घसरण रोखण्यासाठी सर्वांनी मिळून “शास्त्रीय’ उपाययोजना करायचं ठरवलं तर पुन्हा एकदा तेजी येणार नाही का? हा प्रश्न आत्यंतिक बाळबोध असला, तरी त्याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही. असो, या कथित चक्रांपैकी एक आवर्तन आपण सध्या पाहत आहोत.
उगवलेला सूर्य कधीतरी मावळणारच आणि मावळलेला कधीतरी उगवणारच, या न्यायानं ज्या कंपन्यांनी कोविडकाळात अब्जावधींची माया जमवली, त्या कंपन्यांनी आता कामगारकपात सुरू केलीये. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची छाटणी करणाऱ्या बहुतांश कंपन्या ऑनलाइन सेवांशी संबंधित आहेत.
ज्या कंपन्यांची नावं जगात मोठ्या मानानं घेतली जातात, ज्या कंपनीत नोकरी मिळणं म्हणजे आयुष्याचं कल्याण होणं मानलं जातं, त्या कंपनीनं गेटबाहेर काढणं संबंधितांना कसं वाटत असेल, हे त्यांचं त्यांनाच माहीत..! एकाच वेळी जॉइन झालेल्यांपैकी काहीजण अचानक नोकरी गमावत असतील तेव्हा एकमेकांकडे पाहून काय विचार करत असतील? बचावलेला स्वतःला भाग्यवान समजत असेल की आपण सुपात आहोत. कोविडकाळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, हे आपल्याला माहीत आहेच. अशा अडचणीच्या काळातच काही कंपन्यांनी भरती करून ही बेरोजगारी कमी करण्यास मदत केली, असं त्यावेळी सांगितलं गेलं होतं.
ऍमेझॉनचं नाव त्यात सगळ्यात वरच्या स्थानी होतं. आज त्याच कंपन्या हजारो लोकांना अचानक बेरोजगार का करत आहेत? वस्तुतः कोविडच्या काळात ऑनलाइन आणि घरपोच सेवांची गरज अपेक्षेपेक्षाही खूप वाढली होती म्हणूनच अशा कंपन्यांनी भरती केली होती आणि आज ती गरज अचानक कमी झाल्यामुळेच कर्मचाऱ्यांना डच्चू दिला जातोय. परंतु मोठ्या कंपन्यांनी एकदा कामगारकपात सुरू केली, की मंदीची भीती आणखी गडद होते आणि मग छोट्या-मोठ्या कंपन्याही त्यांचं अनुकरण करू लागतात, हेच खरंय!
तेजी असो वा मंदी असो, कोविडकाळ असो वा कोविडोत्तर काळ असो, संकटाची थेट झळ कंपन्यांना नव्हे तर कर्मचाऱ्यांनाच बसते, हे वास्तव आपण ताज्या उदाहरणांमधून जाणून घेतलं पाहिजे. कंपन्या कोविडकाळातही कमावत होत्या, अब्जाधीशांची संपत्ती वाढतच होती, हे नुकतंच समोर आलंय. परंतु बेरोजगार झालेल्यांची क्रयशक्ती कमी होऊन जेव्हा ते बाजारपेठेकडे फिरकेनासे होतात, तेव्हा मंदी गडद होते. श्रम “हायर’ करणं ही खरोखर रोजगारनिर्मिती आहे का? विचार केला पाहिजे..!