पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचा अवाजवी प्रभाव टाळावा
भुवनेश्वर, दि. 3 – भारतीय तंत्रज्ञान व विज्ञान यांचा उद्भव भारताच्या गरजा व त्यादृष्टीने प्राधान्याची आवश्यकता यातूनच झाला पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्यावर श्रीमंत पाश्चिमात्यांच्या तंत्रज्ञानाचा अवाजवी पगडा पडू देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे केले.
आपल्याला आपल्या मार्गापासून विचलित करू पाहणाऱ्या परकीय हितसंबंधियांच्या प्रयत्नापासून भारतीय शास्त्रज्ञांनी सतत दक्ष राहावे, असा इशारा त्यांनी दिला. त्या म्हणाल्या, परकीय शास्त्रज्ञांच्या अशा विधानांना भारतीय शास्त्रज्ञांनी पृथक्करण व संपर्क याद्वारे आव्हान दिले पाहिजे. स्वावलंबनासाठी शोध करण्याची खास जबाबदारी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांच्यावर आहे, असे इंदिरा गांधी यावेळी म्हणाल्या.
मार्चमध्ये निवडणुका हा निव्वळ तर्क
नवी दिल्ली – निवडणुका येत्या मार्च महिन्यात होतील, अशी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी निव्वळ अंदाज असून ती निराधार आहे, असा खुलासा गृहखात्याचे राज्यमंत्री ओम मेहता यांनी आज केला. परिस्थिती निवळू लागल्याने अंदाज व्यक्त करण्याची क्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी देशात लोकशाही कारभार सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. विरोधी पक्ष पंतप्रधानांशी सहकार्य करून परिस्थिती निवळविण्यास मदत करतील अशी आशा मेहता यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतींच्या प्रकृतीत सुधारणा
मद्रास – राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या प्रकृतीत आज थोडी सुधारणा झाली असून तथापि त्यांना आजचा दिवस विश्रांती घ्यावी लागेल.