द्या सोडून! काहीही होणार नाहीये. कुणीही माफी मागणार नाहीये, कुणीही पदाचा राजीनामा देणार नाहीये, कुणाचंही पद काढून घेतलं जाणार नाहीये आणि कुणालाही परत बोलावलं जाणार नाहीये. तुम्ही-आम्ही मात्र रोज मोर्चात असणार आहोत.
आज ह्यांच्या; उद्या त्यांच्या! आपण घसा खरडून घोषणा देणार, पुतळे जाळणार, कुणाची तरी जिवंतपणी अंत्ययात्रा काढणार, काळं फासणार, कुणाच्यातरी पोस्टरला चपलेनं “गोंजारणार’… आपण कालही असेच होतो, आजही असेच आहोत आणि उद्याही असेच असणार आहोत. हल्ली गवत भरलेल्या कापडी पुतळ्यावरचे चेहरे फक्त बदलताहेत. रॉकेल-पेट्रोल म्हणून ज्यांचा वापर केला जातोय, ते तुम्ही-आम्ही कॉमन आहोत.
वेडवाकडं बोलणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला ही माणसं आपला वापर करून गुडघ्यावर आणायला बघतात. जमलं तर जमलं, नाहीतर स्वतःच वेडंवाकडं बोलतात आणि म्हणतात, “आधी तुम्ही माफी मागा, तरच आम्ही मागू.’ प्रत्यक्षात माफी कुणीच मागत नाही. हेही आणि तेही! मग आपण यांच्या मागे बेंबीच्या देठापासून घोषणा देत का फिरायचं? तुमच्या-आमच्या समस्येसाठी मोर्चा कुणी काढतंय का? आपल्या देशात सर्वाधिक युवा लोकसंख्या आहे. तिला काम दिलं तर आपण नंबर एक होऊ; अन्यथा रसातळाला जाऊ, याची कुणाला फिकीर आहे का? रोज एका महापुरुषाचा अवमान आणि त्याच त्या विषयांवरून वाहिन्यांवरचं फालतू चर्वित्चरण..! इशारे-प्रतिइशारे, धमक्या-प्रत्युत्तरे आणि कानठळ्या बसवणाऱ्या त्याच-त्या बातम्या..!
बस्स झालं आता! आपण, विशेषतः आपल्यातल्या तरुण मंडळींनी आता सावध व्हायला हवं. सावध म्हणण्यापेक्षा “हुशार’ व्हायला हवं. क्षमतेचं, निष्ठेचं मार्केटिंग करायला हवं. त्यासाठी एक बहुपयोगी योजना आमच्याकडे आहे. इतकी फायदेशीर योजना आजवर कुणी पाहिली नसेल. सर्वांचंच कल्याण होईल, अशी ही एकमेवाद्वितीय योजना असून, तिचे टप्पे पुढीलप्रमाणेः 1) ज्यांना “खुल्लम्खुल्ला’ बोलायचंय, अशा नेतेमंडळींची सुरक्षा यंत्रणा सर्वप्रथम काढून घ्यावी. झेड नको नि वाय नको! 2) या मंडळींना आपली खासगी सुरक्षा व्यवस्था उभारण्यास भाग पाडावं. 3) आपापल्या नेत्याविषयीची निष्ठा भररस्त्यात शिरा ताणून दाखवणाऱ्या युवकांमधून खासगी सुरक्षेकामी भरती करण्यात यावी. या रक्षकांना संबंधित नेत्याकडून पगार, पेन्शन मिळावी.
या बहुपयोगी योजनेचे फायदे येणेप्रमाणे ः
1) नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणेत गुंतलेले पोलीस कर्मचारी समाजासाठी उपलब्ध होतील आणि एखाद्या मोटारीबरोबर बारा किलोमीटर फरफटत जाणाऱ्या तरुणीला दोन-तीन किलोमीटरमध्येच वाचवणं शक्य होईल. 2) नेत्यांच्या मागे “डेली-वेजेस’वर फिरणाऱ्या तरुणांना “पर्मनंट’ काम मिळेल. युनिफॉर्म मिळेल. 3) देशातला रोजगार वाढेल. 4) जे नेते अशा भरतीच्या बाबतीत कंजूषपणा करतील, त्यांना जपून बोलावं लागेल. 5) बोलघेवड्यांनाही मोकळं रान मिळेल.
लक्षात घ्या, देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी आधी आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला संधीचा शोध घेता यायला हवा. आजूबाजूला जर अन्य कोणत्याही विषयाची चर्चाच होत नसेल, तर संबंधित विषयातच आपल्याला रोजगार, व्यवसायाच्या संधी शोधाव्या लागतील. वय निघून गेल्यावर पुतळ्यांना काळं फासण्याचं कामही कुणी देणार नाही. महापुरुषांबद्दल तुम्हा-आम्हाला खरा आदर आहे; परंतु आपल्या आंदोलनामुळं पानही हलत नसेल, उलट रोज नव्यानं वक्तव्यं होणार असतील, तर फेरविचार करायलाच हवा!फ