भारतात विदेशी वृक्षांची लागवड होत असल्यामुळे तापमान वाढ होत आहे, असा काही अभ्यासकांचा जावईशोध आहे. तथापि, हा दावा चुकीचा वाटतो.
सध्या संपूर्ण देशभरात एकीकडे मान्सूनच्या आगमनाने मनाला दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे लोकजीवन हैराण झाले आहे. अलीकडील काळात दरवर्षी उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. हवामानतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक या सर्वांकडून याची मीमांसा करताना जागतिक तापमानवाढीचा हा परिपाक असल्याचे सांगितले जाते आणि तो कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे दोहन थांबवून वनसंपदा-वृक्षसंपदा व्यापकपणाने व वेगाने वाढवणे हे उपाय सांगितले जातात. परंतु अलीकडेच काही अभ्यासकांनी परदेशी वृक्षांमुळे तापमान वाढत असल्याचा दावा केला आहे. मुळात बहुतांश देशी आणि विदेशी पर्णझडी वृक्षांमध्ये हिवाळ्याच्या अखेरीस व प्रामुख्याने उन्हाळ्यात पानगळ होते. पानगळीच्या कालावधीत तापमानवाढ होते. मग ती परदेशी वृक्षांमुळे होते असे म्हणणे चुकीचे आहे. तापमानवाढ ही हरितगृह वायूंच्या अमर्याद वाढीमुळे होत आहे. वृक्षांमुळे तापमान कमी होण्यास मदतच होत असते; मग ते वृक्ष देशी असोत किंवा विदेशी!
या अभ्यासकांनी आपला दावा मांडताना परदेशी वृक्षांच्या भारतात असणाऱ्या जातींची संख्या 18 हजार असल्याचे म्हटले आहे; परंतु ते साफ चुकीचे आहे. कारण देशात एकूण वनस्पतींच्या 50 हजार जाती आहेत. यामध्ये रोप, वेल, झुडूप व वृक्षवर्गीय सर्व वनस्पतींचा समावेश आहे. अशी वस्तुस्थिती असताना फक्त वृक्षांच्या 18 हजार जाती आहेत, असे म्हणणे अयोग्य आहे. आजमितीला भारतात सुमारे 3000 ते 3100 वृक्षांच्या जाती आहेत. यापैकी 1200 ते 1250 जाती परदेशी वृक्षांच्या आहेत. महाराष्ट्रात वृक्षांच्या 752 जाती असून यापैकी 292 जाती विदेशी आहेत. यामध्ये निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुबाभूळ, सुरू, ग्लिरिसिडीया, सिलव्हर ओक, मॅनजियम, विलायती शमी, कोनोकार्पस, महोगनी, लक्ष्मीतरू इत्यादी सुमारे 100 ते 110 जातींचे विदेशी वृक्ष अतिरेकी गुणधर्माचे असल्याने पर्यावरण व स्थानिक जैवविविधतेसाठी मारक व घातक आहेत. वनविभागाने देशभरात या सर्व वृक्षांची मोठ्या प्रमाणात आणि एकसुरी लागवड केली आहे. यामुळेच देशात विदेशी वृक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बागांमध्ये आणि रस्त्याकडेने गुलमोहर, रेन ट्री, पितमोहोर, काशिद, सिंगापूर चेरी आदी अनेक अतिआक्रमक गुणधर्माच्या विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या सर्व विदेशी वृक्षांच्या जाती स्थानिक पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी घातक आहेत. अर्थात सर्व परदेशी वृक्ष घातक नाहीत.
अर्थात, यानिमित्ताने विदेशी वृक्षांचा मुद्दा चर्चेत आला आहे. आपल्या देशात सुमारे 50 हजार वनस्पती प्रजाती असून यापैकी 40 टक्के प्रजाती विदेशी आहेत. या प्रजाती विविध खंडांतून, देशांतून आपल्या देशात आलेल्या आहेत. देशात 20 हजारांच्या आसपास विदेशी वनस्पतींच्या प्रजाती आढळून आल्या असून यातील बहुतांश प्रजाती तणवर्गीय आहेत. 25 टक्के प्रजाती अतिआक्रमक गुणधर्माच्या आहेत. तणवर्गीय वनस्पतींबरोबर विदेशी वृक्षही अतिआक्रमक गुणांचे आहेत. या आक्रमक तणामुळे भारतात दरवर्षी शेतीउत्पादनात 30 टक्के इतकी घट होते. यावरून त्यांची घातकता लक्षात येते.
घाणेरी किंवा टणटणी हे झुडुपवर्गीय विदेशी तण मूळचे मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील असून 1820 च्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिकाऱ्यांनी ही शोभेची वनस्पती म्हणून बागेत लागवड करण्यासाठी भारतात आणल्याची रितसर नोंद आढळते. पण नंतर या शोभिवंत वनस्पतीचा तण म्हणून भारतभर प्रसार झाला. आज देशात 13 दशलक्ष हेक्टर जमिनीवर आणि वनक्षेत्रात घाणेरी पसरलेली आहे. तिला नियंत्रित करणे अशक्यप्राय बनले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात हे तण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर केंदाळ, कॉंग्रेस म्हणजेच गाजरगवत, रानमोडी, ओसाडी या तणांनीही मोठा भूभाग व्यापला आहे. कॉसमॉस, झिनिया, वेडेलिया, विदेशी आघाडा अशा अनेक विदेशी शोभिवंत वनस्पतीही तण म्हणून भारतात सर्वत्र पसरल्या आहेत. ही तणे चिवट असल्याने त्यांनी आपल्याकडील गवताळ प्रदेश व्यापले आहेत. परिणामी आपल्या पाळीव तसेच जंगली जनावरांच्या चराऊ जागा कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे शोभिवंत विदेशी वनस्पतींचा प्रचार-प्रसार आणि लागवड करताना योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
सुरुवातीला नमूद केल्यानुसार वनविभागाकडून देशात लागवड केले जाणारे निलगिरी (ऑस्ट्रेलिया), ऑस्ट्रेलियन बाभूळ (ऑस्ट्रेलिया), ग्लिरिसिडिया (मेक्सिको), सुबाभूळ (मध्य अमेरिका), सुरू (ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशिया) हे सर्व वृक्ष विदेशी आहेत. निलगिरी वृक्षाच्या अनेक जात आहेत. महाराष्ट्रातच निलगिरीच्या 13 जातींची लागवड केली आहे. आज भारतात सुमारे 10 लाख हेक्टरपेक्षाही अधिक भूक्षेत्रावर निलगिरीची लागवड आढळते. या वृक्षलागवडीचे तोटे लक्षात आल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने 2017 मध्ये निलगिरी वृक्षलागवडीवर त्या राज्यात बंदी घातली. अशी बंदी सर्व राज्यांत येणे आवश्यक आहे. असंख्य विदेशी तणे, बागेतील अनेक विदेशी शोभिवंत वनस्पती आणि वनीकरणासाठी आयात केलेले सर्व विदेशी वृक्ष या सर्वांचा आपल्या देशात शिरकाव आणि प्रसार झाल्याने आणि त्यांच्या आक्रमक गुणधर्मामुळे आपल्या परिसंस्था विस्कळित झाल्या आहेत. यामध्ये अधिकची भर म्हणून देशातील बागांमध्ये आणि रस्त्याकडेने विदेशी वृक्षांचे आक्रमण झाले असून सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरले आहे. यामध्ये गुलमोहर (मादागास्कर), रेन ट्री (मध्य व दक्षिण अमेरिका), पिचकारी (आफ्रिका) व पीतमोहर (श्रीलंका) हे वृक्ष आहेत.
पूर्वी रस्त्यांच्या, महामार्गांच्या दोन्ही बाजूस हमखास आढळणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडूलिंब यांसारखे देशी वृक्ष आज रस्ते विकास प्रकल्पांमुळे पूर्णपणे कायमचे नामशेष झाले आहेत. रस्तेविकासानंतर केलेल्या वृक्षलागवडीमध्ये सातवीण, कदंब, करंज, जारुळ यांसारख्या देशी वृक्षांची संख्या फार कमी आहे. वनीकरणासाठी लागवड केल्या जाणाऱ्या सर्व विदेशी वृक्षांच्या रोपांची निर्मिती प्रामुख्याने वनविभागाच्या रोपवाटिकांमध्येच होते. वास्तविक, देशी वृक्षांच्या इतक्या प्रजाती असूनही त्यावर संशोधन का होत नाही, हा यानिमित्ताने उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे. मागील काळात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आज ज्या वृक्षांचे वयोमान संपले आहे त्यांच्या जागी तरी किमान देशी वृक्षलागवड केली गेली पाहिजे. पण तेही होत नाहीये.
याचे कारण निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ यांसारखे अनेक विदेशी वृक्ष आपल्याकडील वातावरणात जोमाने आणि वेगाने वाढतात; पण जवळपास असणाऱ्या देशी वृक्षांना ते वाढू देत नाहीत. परिणामी तेथील नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. या वृक्षांखाली इतर रोपे व झुडुपवर्गीय वनस्पतीही वाढू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होऊन आपली स्थानिक जैवविविधताही नष्ट होऊ लागते. आपले पक्षी विदेशी वृक्षांवर आसरा घेत नाहीत आणि त्यावर आपले घरटेही बांधत नाहीत. त्यामुळे विदेशी वृक्ष लागवडीचा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या सहजीवनावर विपरित परिणाम होतो. विदेशी झाडे कार्बन उत्सर्जन करतात, अशाही अफवांचे पीक आले होते.
शेवटी, सर्व विदेशी वृक्ष हे धोकादायक अथवा नुकसानदायक नसले तरी त्यांची एकसुरी लागवड बंद झाली पाहिजे आणि देशी वृक्षलागवडीस प्राधान्य दिले पाहिजे.