सूर्य ही तेजाची, प्रकाशाची, ज्ञानाची, चैतन्याची देवता आहे. अंधाराची रात्र दूर करून प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करणे हे त्या सूर्यनारायणाचे महत्त्वाचे कार्य आहे. रोज प्राचीवर उगवणारा सूर्य हा अवघ्या विश्वाला एक नवी चेतना, एक नवी प्रेरणा देत असतो. रोज पहाटे न चुकता प्राचीवर उगवणारे ते तांबूस सूर्यबिंब हे जेव्हा हळूहळू वर येते तेव्हा हलके हलके रात्रीची अंधाराची चादर दूर होते आणि त्याचा प्रकाश ज्या ज्या वस्तूंवर पडतो ती ती गोष्ट दृश्यमान होते.
या मंगलमय पहाटेचे, या तेजोनारायणाचे स्वागत करायला पक्षी गाऊ लागतात, गोठ्यातल्या गायी, गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात, झाडावरची फुले, वेलीवरच्या कळ्या उमलू लागतात. तो सुगंधाचा ठेवा घेऊन मंद मंद पहाट वारा तना-मनास जागवीत येतो. दूरवर कुठेतरी मंदिरातल्या घंटा वाजू लागतात आणि ओठावर येतात ते भूपाळीचे सूर.
सूूर्य हा निसर्गातला घटक स्वत: कात्यशील, तत्पत असल्याने तो आपल्यालाही कार्यशीलतेचाच धडा देत असतो. या सूर्यप्रकाशाने, त्याच्या प्रखर सूर्यकिरणांनी सागरातील पाण्याची वाफ होते. त्याच्यामुळेच सृष्टीतले ऋतुचक्र हे अखंडपणे चालू आहे. तसेच सकल सृष्टीला, प्राणिमात्रांना, जीवजंतूंना हवे असणारे पाणी, धान्य, उष्णता या सर्व गोष्टी या सूर्यामुळेच प्राप्त होतात. त्याच्या अस्तित्वामुळेच दिवस रात्रीचा खेळ चालू आहे. सातत्य, अखंडता, प्रकाशाचे देणे, चैतन्याची उधळण करणे, शक्ती सामर्थ्याचे दान देणे. अशा अनेक गोष्टी हा सूर्य आपल्याला निर्पेक्ष बुद्दीने देतो. या गुणांमुळेच तो पूजनीय आहे.
सूर्याप्रमाणेच चंद्राच्या शीतल चांदण्यांच्या प्रकाशानेही जीव सुखावतो. शांत प्रसन्न चंद्र आणि त्याची शीतल किरणे तापाचा दाह नाहीसा करतात. तो चंद्रप्रकाश सुख प्रदान करतो. तेजाला सौम्यता देतो. अनेक वनौषधी या चंद्रप्रकाशातच वृद्धिंगत होतात. चंद्रप्रकाशात विकसन पावलेल्या दिव्य वनौषधीमुळेच अनेक रोगांचा नाश होतो.
वनस्पतीच्या ठायी त्याच्या फळामध्ये येणारी रसाळता आणि माधुरीही या चंद्रप्रकाशातच वाढीस लागत असते. मानवी मनोवृती प्रफुल्लित करण्यासाठी या चंद्राचीच मोठी मदत होते. प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत वाढत जाणाऱ्या चंद्रकला या आपल्याही शून्यावस्थेकडून ते पूर्णत्वाकडे प्रगत होत जाण्याचीच शिकवण देतात.