नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे युग भाजपमध्ये सुरू झाल्यापासून वसुंधराराजे शांत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे राजस्थान हे असे एक राज्य आहे, जेथे दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांना आलटून पालटून संधी दिली जाते. वाळवंटी भाग असलेल्या या राज्यात “ऊँट करवट बदलेगा’ असेही म्हटले जाते. सध्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार आहे. जेमतेम वर्षभरावर निवडणुका आल्या आहेत आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील “सख्य’ जगजाहीर आहे. त्यामुळे भाजपची सत्तेत वापसी निश्चित मानली जात आहे, असे म्हणण्यास वाव आहे. तथापि, जे कॉंग्रेसमध्ये घडते आहे त्यापेक्षा भाजपातील स्थितीही वेगळी नाही. येथेही नाराजीचे महानाट्य सुरू आहे. अशात राजस्थानातील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.
पूर्वी या राज्यात भारतीय जनता पार्टीकडे भैरोसिंह शेखावत यांच्या रूपात दिग्गज नेतृत्व होते. शेखावत हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या काळातील नेते. या नेत्यांच्या सावलीत शेखावत झाकोळले गेले नाहीत. अटलजी गेले, आडवाणी बाजूला पडले. शेखावत यांच्या पश्चात त्या उंचीचा नेता भाजपला लाभला नाही. नाही म्हणायला माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे हा राज्यव्यापी चेहरा त्यांच्याकडे आहे. मात्र वसुंधराराजेंची खासियत ही की त्या दिल्लीश्वरांचे निर्णय लादून घेत नाहीत. राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना याची प्रचिती आली आहे. त्यांचे आदेश वसुंधरा यांनी उघडपणे धुडकावले होते.
भाजपाने काही काळापासून राज्यात जनाक्रोश यात्रा सुरू केली आहे. त्यापासून वसुंधराराजे यांनी अंतर राखून ठेवले आहे. सध्या केंद्रात अर्थात दिल्लीच्या वर्तुळात सक्रिय असलेले राजस्थानातील काही चेहरे या यात्रेचा रथ हाकताना दिसत आहेत. तथापि, राज्यात सत्ता जर आली तर मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. भाजपने अजूनही कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार ते जाहीर केलेले नाही. पक्षाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रित असतो. विजयाचे श्रेय अर्थातच मोदी यांनाच दिले जाते. मात्र विधानसभा निवडणुका लढवताना प्रदेश पातळीवर त्या राज्यातील लोकप्रिय चेहराही भाजपकडून पुढे आणला जात असतो. उत्तर प्रदेशात योगी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी ही त्याची उदाहरणे. राजस्थानात आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हायलाच हवे तरच आपण झोकून देऊन प्रचारात उतरू, अशी वसुंधराराजेंची अपेक्षा असावी. त्या दिशेने त्यांना पक्षाकडून अद्याप काही संकेत मिळाले नसल्यामुळे तूर्त त्या काठावरच बसल्या आहेत.
कोण आहेत दावेदार?
वसुंधराराजे यांच्यासह केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया आणि माजी मंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया हे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार आहेत. आताच कोणा एकाचे नाव जाहीर केले, तर हिमाचलप्रमाणे येथेही गटबाजीला उधाण येण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये भाजप अगदी थोड्या मतांच्या फरकाने सत्तेपासून दूर राहिला. त्यांच्या पराभवात त्यांच्याच बंडखोरांचा मोठा हातभार होता. राजस्थानात तर चक्क चार बडे नेते मुख्यमंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. कोणा एकाला पुढे केले तर अन्य तीन नेत्यांचे समर्थक पाडापाडीचा उपद्रव करणार याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर न करताच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी भाजपकडून केली जाईल अशी शक्यता आहे. पूनिया यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदतही संपली आहे. त्यांच्या मुदतवाढीचा निर्णय त्यामुळेच अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यांना मुदतवाढ दिली तर पक्ष त्यांना अनुकूल भूमिका घेतो आहे, असा संदेश जाऊ शकतो यासाठीच भाजप तो धोका पत्करण्याचे टाळते आहे.
जनाक्रोश यात्रा खरेतर राजे यांच्या सहभागामुळे अधिक व्यापक झाली असती. याची त्यांना स्वत:ला आणि पक्षाला चांगली कल्पना आहे. मात्र त्यांनी यात्रेला आतापर्यंत प्रतिसाद दिलेला नाही. गुजरातमध्ये आदिवासी पट्ट्यात आपले स्थान भक्कम करण्यासाठी भाजपने वर्षभर अगोदरच यात्रा सुरू केल्या होत्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यात पुढाकार घेतला होता. तेथील मंत्रिमंडळात सगळेच नवखे चेहरे असल्यामुळे कोणाची नाराजी अथवा रूसवे-फुगवे आदींचा सामना भाजपला करावा लागला नाही. निवडणुकीत म्हणूनच पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. याउलट राजस्थानात चारही दावेदार प्रबळ नेते आहेत. अर्थात, ज्याप्रमाणे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघे पक्षाची संपत्ती आहेत अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली होती तशीच भूमिका भाजपही राजस्थानच्या बाबतीत घेताना दिसतो. वसुंधराराजे यात्रेत सहभागी झाल्या नाहीत त्यामागे काही वैयक्तिक कारणे आहेत. त्यामुळे त्या लांब असल्यातरी पक्षाचे काम करणे थांबवतील अशातला भाग नाही, असे भाजपला आजतरी सांगावे लागते आहे.
हिमाचलमध्ये गटबाजी आणि कुरघोड्यांमुळेच भाजपला सत्ता गमवावी लागली. तर कॉंग्रेसमध्ये काठावरचे बहुमत मिळूनही गटबाजीमुळे सत्ता जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. बड्या नेत्यांचा बडेजाव हा पक्षाला तापदायकच ठरत असतो. राजस्थानात आज तशीच परिस्थिती आहे.