-माधुरी तळवलकर
लॉकडाऊनचा 76वा दिवस उगवल्याचे या फिल्ममध्ये सुरुवातीलाच दिसते. विनय दुबे हा रिलेशनशिप मॅनेजर नुकताच बाहेरून घरात येतो आहे. तोंडाला मुखपट्टी, हातात मोजे… आल्याबरोबर तो हे करोनाचे अलंकार, एकेक करून उतरवतो. बायकोशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलून म्हणतो, “माझी आता कॉल करायची वेळ झाली. कामाला बसतो.’
रिलेशनशिप मॅनेजरचे काम काय? तर बॅंकेकडून येणाऱ्या वेगवेगळ्या योजना ग्राहकांना सांगणं, गुंतवणुकीविषयी सल्ला देणं, काही नवीन उत्पादनाची माहिती देणं… त्याचं कमिशन ह्याला मिळतं आणि ग्राहकांचीही सोय होते. ग्राहकांचा याच्यावर भरंवसा आहे. दोन-तीन कॉल्स होतात. सगळे लॉकडाऊनला, मंदीला कंटाळलेत. पण हा काही ना काही मार्ग काढून त्यांचा मूड जरा चांगला करतो. मग रवी अरोराला फोन करतो. अचानक काही हुंदके ऐकू येतात. मधेच तिला तो दरडावताना ऐकू येते. तिचा आवाज, “प्लीज, डोन्ट हिट मी…’ एक जोरात चपराक मारल्याचा आवाज. फोन बंद. हा अस्वस्थ होतो.
अनुप सोनी आणि दिव्या दत्त या गुणी कलाकारांनी आपल्या बोलक्या चेहऱ्याने अनेक गोष्टी व्यक्त केल्या आहेत. कविता अरोराला मारहाण होतेय हे त्याच्या लक्षात येते. तो आता त्या कुटुंबाशी चांगला परिचित झालेला. विनय दुबे तिलाच फोन करतो. सुरुवातीला ती बोलण्याचे टाळते. पण तो “तुम्हाला पाहिलं तेव्हाच माझ्या मोठ्या बहिणीची मला आठवण आली’; असं सांगून तिला बोलतं करतो. तिच्याशी कळवळून बोलू लागतो की, माझी बहीण सासरचा जाच सहन करीत राहिली आणि अखेरीस तिनं आत्महत्या केली. ती इतकी हुशार होती, शूर होती; तिनं का नाही त्या वेळी स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पाऊल उचललं?…
कविता अरोरा हळूहळू न बघितलेल्या त्याच्या बहिणीच्या दुःखाशी समरस होते. ती विनय दुबेला म्हणते, “संसार एकटीचा नसतो. मुलंही असतात पदरात. त्यांच्यासाठी सहन करावं लागतं.’ पण तो तिला हर प्रकारे धीर देतो. आत्मविश्वास देतो. अशा स्त्रियांना चांगल्या माणसांची साथ मिळू शकते, पण त्यांनी स्वतः त्याविरुद्ध खंबीरपणे उभं राहायला हवं… असा एक ठाम विचार तिला देतो. कविताचा चेहरा बदलू लागतो. आधीची अगतिक कविता चांगली करारी दिसू लागते. तिनं प्रतिकार करण्याचं ठरवलंय असं नुसतं तिच्या चेहऱ्यावरून कळतं. त्याला थॅंक्स म्हणून ती फोन ठेवते.
विनय दुबेची बायको त्याला विचारते, “अशी कुणी तुला बहीण होती हे तर तू मला कधी बोलला नाहीस.’ तो अर्थपूर्ण नजरेनं तिच्याकडे पाहतो आणि इथेच फिल्म संपते. पाहणाऱ्यांनी काय ते समजून घ्यावं. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचार वाढले असल्याची बातमी आपण अलीकडेच वाचलेली. ही फिल्म पाहताना त्याची आठवण येते.