सोलापूरच्या गोविंद काळे यांचा दस्तऐवज, धरणगाणी आणि सखी सांगाती अशा तीन काव्यसंग्रहानंतर आलेला हा चौथा काव्यसंग्रह. या कवितासंग्रहाला “हरवलेल्या कविता’ या शीर्षकाची योजना कवीने केलेली असली तरी या कविता कुठेही हरवलेल्या नव्हत्या याची जाणीव कवीच्या मनोगतातून होते.
ते केवळ गोविंद काळे यांचं मनोगत नाही ते प्रत्येक कवीचं मनोगत आहे. कारण हात लिहिता झाल्यापासून आणि विचार शब्दबद्ध करण्याची वाट सापडल्यापासून प्रत्येक कवी लिहीत असतो. परंतु बऱ्याचदा टाळ्या घेणाऱ्या निवडक कविता सादर केल्या जातात. एखादं सूत्र घेऊन जन्माला येणाऱ्या कविता कवितासंग्रहात जागा पटकावतात. काही कविता नियतकालिकात, दिवाळी अंकात प्रकाशित होतात. त्यातून उरलेल्या ज्या काही कविता आहेत त्या कवितांचा संग्रह म्हणजे हरवलेल्या कविता.
गोविंद काळे यांनी कविता, कादंबरी, अहिल्यागाथा, संतांचं अभंगमय चरित्र अशी सर्व प्रकारात वाङ्मय निर्मिती केली आहे. पूर्ण आयुष्य पाणी आणि धरण याच परिघात गेल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या कवितेत धरणाचे, पाण्याचे संदर्भ येतात. हक्काचं पाणी, डोळ्यात धरण अशा अनेक कवितांमध्ये असे संदर्भ आले आहेत. पाण्यासारखा वाहत राहा या कवितेत आपल्या मुलाशी संवाद साधताना ते म्हणतात-
त्यांना माझ्यातल्या महापुराचं भय वाटलं
म्हणून त्यांनी तुला अडवलं
तुझ्या भोवतीने धरण बांधायचं ठरवलं
भोवरा या कवितेतील-
शेवटी दोघंही बुडालो
एकमेकांत..!
ही कलाटणी वाचकाच्या मेंदूवर अधिराज्य गाजवते आणि स्वतःचा अहंभाव मोडीत काढून एकमेकांत बुडाल्याशिवाय संसाराची सार्थकता नाही हेही सांगते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कवितेत ते म्हणतात-
बाळांनो, मी भिंती पाडल्या
फार फार कष्ट पडले
आता तुम्ही भिंती बांधू नका
या ओळी जो संदेश देऊ बघतात. तो संदेश आचरणात आणण्याची समाजाची मानसिकता आहे का, असा प्रश्न पडतो. यातील प्रकाशाचे तळे, स्वप्नं, मीठ-साखर, संसारासाठी, लिहीत राहा, जीवनज्योत, भोवरा, सवत, कटाक्ष तेही या वयात अशा काही कवितांचा केंद्र स्व म्हणजे स्वतः कवी आहे. परंतु लेखकाचं लेखन जरी स्वंकीत असलं तरी ते समाजाचं प्रतिनिधित्व करतं. कारण कवी लेखक समाजाचाच एक घटक असतो. सामाजिक आशयाला कवेत घेऊ बघणाऱ्या स्वर्गात निवडणुका, मित्रा, बापूजी भ्रूणहत्या, झाडं अशा सामाजिक आशयाच्या कविता वैश्विक सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात. या संग्रहातील सगळ्याच कविता मुक्त छंदात असल्या तरी त्यामुळे वाचकाच्या मनावर ठसा उमटविण्यात त्या कुठेच कमी पडत नाहीत.