सवड काढून कधीतरी लहानपणाच्या आठवणी काढून पाहा. प्राथमिक, माध्यमिक शाळेतल्या… चांगल्या-वाईट, आवडत्या-नावडत्या, आनंदाच्या, दुःखाच्या, वेदनेच्या आणि हो… भीतीच्याही! प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती येऊन गेलेलीच असते, ज्यामुळे अचानक त्याचं मन शाळेत रमेनासं होतं. मनात एक प्रकारची विचित्र भीती घर करून बसते. ती भीती शाळेशी जोडली जाते. किंबहुना शाळा म्हटलं की धडकीच भरू लागते.
शाळेत जाणं टाळता आलं तर किती बरं होईल, असं वाटू लागतं; पण नाइलाज असतो. त्या धास्तीविषयी आईवडिलांशी बोलणं योग्य वाटत नाही, कारण त्यांना ते शाळा बुडवण्याचं निमित्त वाटू शकतं. मित्रांना सांगताना लाज वाटते; संकोच वाटतो. आईवडिलांनी किंवा मित्रांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती बिघडली तर..? ज्याची भीती वाटते त्याला राग आला तर..? असे असंख्य प्रश्न मनात येत राहतात आणि आपण एकलकोंडे होत जातो. एकट्यानंच सहन करावा, असा तो त्रास असतो. हळूहळू मनस्थिती अशी होते की, शाळा सुटून घरी आल्यावर हायसं वाटतं. म्हणजे घरातल्यांच्या सान्निध्यात भीती वाटेनाशी होते. हळूहळू भोवतालात ती भीती विरघळत जाते आणि आपली दिनचर्या पूर्ववत होते. कबूल करायचंच ठरवलं तर प्रत्येकानं कधी ना कधी हा अनुभव घेतलेला असतोच. शाळेत नाही तर कॉलेजात… तिथं नाही तर ऑफिसात..!
आता असा विचार करून पाहा, की आपण भाग्यवान आहोत, कारण ही भीती शाळा सुटल्यावर आपल्याबरोबर घरी येत नव्हती. आता तुमच्या मुलांकडे पाहा. कदाचित त्यांच्या मनात अशीच एखादी भीती घर करून बसली असेल; पण त्यांना येणारा अनुभव आपल्यापेक्षा खूप वेगळा असेल. ही धास्ती मुलांच्या खिशात बसून घरी येत असेल. रात्री आपल्याला झोप लागलेली असेल; पण कदाचित मुलं जागीच असतील. कुणीतरी असा त्रास देणं, मागे लागणं, पाठलाग करणं, भीती घालणं, सतत डिवचणं, चारचौघात अपमान करणं या सगळ्या गोष्टी “बुलिंग’ या सदरात मोडतात आणि आजकाल त्या 24 तास मुलांचा पाठलाग करतात, कारण प्रकरण आता “सायबर बुलिंग’पर्यंत पोहोचलंय. कोवळ्या वयातली मानसिकता तीच राहिलीये; पण हा छळ क्षणाचीही उसंत घेऊ देत नाहीये.
कधी कुणीतरी मुलांशी मैत्री करत असेल आणि त्यांचे फोटो, व्हिडिओ साठवत असेल… नंतर गुपितं सार्वजनिक करण्याची धमकी देत असेल. चारचौघात अपमान होणं एकवेळ परवडलं; पण सोशल मीडियावरचा अपमान मनावर कायमचा कोरला जाणारा… यातून तऱ्हेतऱ्हेचे शारीरिक आणि मानसिक आजार मुलांना होतायत. प्रदूषणात जगणाऱ्या मुलांना याच वयात चिकटणारे दम्यासारखे आजार बळावत चाललेत.
बुलिंगमुळे दम्याचा ऍटॅक येण्याचं प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये वाढतंय असं अभ्यासांती दिसून आलंय. दमाग्रस्तांमध्ये 12 टक्के मुलं आहेत. शिवाय एकलकोंडेपणा, भावनिक-मानसिक तणाव, आत्महत्या करण्याचे विचार येणं याही गोष्टी मुलांमध्ये वाढतायत, असं बिग डेटा स्टडीमधून निष्पन्न झालंय. एकीकडे आत्यंतिक हिंसक असे मोबाइल गेम खेळणारी आणि दुसरीकडे बुलिंगसारख्या संकटांना सामोरी जाणारी उगवती पिढी काय भोगत असेल, याचा विचार करण्यासाठी त्यांच्याएवढं लहान होणं अत्यंत गरजेचं बनलंय.