मालकांकडील जमिनीबाबत सरकार विचार करणार
पुणे, दि. 5 – जे शेतमालक आपल्या जमिनीमधून राष्ट्रीय सरासरी उत्पन्न काढू शकत नाहीत, त्यांच्याकडे त्या जमिनी ठेवाव्यात काय, याचा विचार करण्याची वेळी आलेली आहे, असा इशारा कृषि खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी आज दिला.
एकरी उत्पादन वाढवा
पुणे- महाराष्ट्रातील शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पेरणीखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे परंतु दर एकरी उत्पादनाच्या बाबतीत मात्र प्रत्येक पिकाबाबत खालचा नंबर लागतो. या वस्तुस्थितीचा विचार करून शेती कार्यक्रमाचा संपूर्ण ताळेबंद आखून याबाबत नव्याने विचार झाला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
केंद्राकडे जादा धान्याची मागणी
मुंबई – आदिवासी रोजगार हमी योजनेतील मजूर, मागासवर्गीय विद्यार्थी, होस्टेल यांना धान्यपुरवठा करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला 25 हजार टन जादा धान्यपुरवठा करावा, अशी विनंती पुरवठामंत्री रत्नाप्पा कुंभार यांनी केली आहे. रेशनवाटपात येणारी तूट व अनियमितपणा दूर करण्यासाठी पुरवठा विभाग धान्यवाटपाची सर्व ठिकाणी एकच पद्धत ठेवणार आहे.
तामिळनाडूत हिंसाचार चालू दिला जाणार नाही
मद्रास – तामिळनाडूत कायदा व सुव्यवस्था यांना कोठेही धक्का लावू दिला जाणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी जाहीर केले. लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चालू दिला जाणार नाही.