– देवयानी देशपांडे
लसीकरण ही वैज्ञानिक बाब असली तरी स्त्रीच्या बाबतीत काही प्रमाणात अंधश्रद्धा तर काही प्रमाणात शंकाकुशंकांनी प्रश्नांची गुंतागुंत अधिकच वाढवली आहे.
मासिक पाळी सुरू असताना स्त्रियांनी करोनाची लस घेऊ नये, अशी पोस्ट मध्यंतरी खूप पसरली. अनेक जबाबदार व्यक्तींनी त्यावर मते मांडली. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही केवळ अंधश्रद्धा आहे, असे म्हटले. हे वारे जरा शांत होत नाहीत, तर गरोदर स्त्रीने करोनाची लस घ्यावी किंवा नाही याबाबत गोंधळ निर्माण झाला. हा प्रश्न अजूनही विचाराधीन आहे.
याचवेळी आणखीही एक चिंतेची बाब काही सर्वेक्षणांतून पुढे आली आहे. जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये लिंगभाव विषमता पाहायला मिळते आहे. म्हणजेच, बहुतांश राज्यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये लसीकरण जास्त प्रमाणात होत आहे. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्हीही मात्रांबाबत असेच निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.
लसीची किमान एक मात्रा घेतलेल्या पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे. नीती आयोगाने सन 2015मध्ये नोंदवल्यानुसार 1000 पुरुषांमागे 900 स्त्रिया हे भारतातील लिंगभाव गुणोत्तर आहे. म्हणजेच, दर 1000 पुरुषांमागे केवळ 867 स्त्रियांचे होणारे लसीकरण हे लिंगभाव गुणोत्तरापेक्षाही कमी असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. आजपर्यंत जेवढ्या लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे; त्यातील 53 टक्के केवळ पुरुष आहेत हे तथ्य एका इंग्रजी वेबसाइटने नोंदवले आहे.
केरळ राज्यातील लिंगभाव गुणोत्तर सर्वोत्तम मानले जाते. याच राज्याने दर 1000 पुरुषांमागे 1125 स्त्रिया अशी नोंद करून स्त्रियांच्या लसीकरणामध्येही मजल मारली आहे. याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांनी स्त्रियांच्या लसीकरणामध्ये उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. याखेरीज, दिल्ली, उत्तर प्रदेश या आणि इतरही राज्यांची स्त्रियांच्या लसीकरणासंदर्भात कामगिरी तितकीशी समाधानकारक नाही. भारतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यसेवेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या स्त्रियांचे लसीकरण झाले. जानेवारी अखेरीपासून मात्र स्त्रियांच्या लसीकरणाचा आलेख खाली जाताना दिसतो, असे माध्यमाने केलेल्या संशोधनातून पुढे आले. फेब्रुवारी 2021 ते मे 2021 या संपूर्ण काळात स्त्रियांमधील लसीकरणाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे.
लसीकरण मोहिमेमध्ये लिंगभाव विषमता प्रतिबिंबित व्हावी यामागची नेमकी कारणे काय असावी? हा विचार करणे प्राप्त आहे. खरेतर, करोना महामारीच्या निमित्ताने आपण सर्वजण टाळेबंदी अनुभवत असताना दरम्यानच्या काळात घरोघरीची गृहिणी त्याही परिस्थितीत सकारात्मक राहून तिच्या सर्व जबाबदाऱ्या बजावताना दिसत आहे. खरेतर, गृहिणीच्या नियमित जबाबदाऱ्यांमध्ये भरच पडली आहे. तरीही गृहिणी घरच्या घरी आपले छंद जोपासताना आणि सकारात्मक राहताना दिसत आहे.
असे असूनही लसीकरणाच्या गुणोत्तरामध्ये नकारात्मकता प्रतिबिंबित होण्याचे कारण काय असावे? या प्रश्नाच्या उत्तराबाबत मात्र अस्पष्टता आहे. मात्र, काही शासकीय अधिकाऱ्यांनी स्त्रिया लस घेण्यासाठी संकोच करतात, असे नमूद केले. स्त्रियांमध्ये लसीकरणाबाबत संकोचाची भावना का आहे, याबाबत मात्र फारशी माहिती अजून उपलब्ध नाही. शिवाय, पुरुष एकत्र बाहेर फिरतात, त्यांना लसीकरणाची माहिती मिळते आहे, लस घ्यायला कुणीतरी सोबत असावे, असे त्यांना वाटत नाही. म्हणून पुरुषांचे लसीकरण जास्त झाले अशी शक्यता वर्तवली जात आहे. याउलट, स्त्रिया कुणी सोबत नाही म्हणून लसीकरण केंद्रावर जाण्यास संकोच करत असाव्या का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. अशी शक्यता मात्र नाकारता येत नाही.
याखेरीज, स्त्रियांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असण्यामागे तंत्रज्ञानाचा घटक जबाबदार आहे का? हा प्रश्नदेखील विचारपात्र आहे. म्हणजे, उदाहरणार्थ, बिहारसारख्या राज्यामध्ये सन 2019-2020च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार, केवळ 51 टक्के स्त्रियांकडे मोबाइल आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यातल्या सगळ्याच स्त्रियांना तो वापरता येत नाही. भारतातील लसीकरण मोहीम ही मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने हे स्त्री-पुरुष लसीकरण गुणोत्तर असंतुलित असावे, असेही म्हणण्यास वाव आहे. परंतु, लसीकरणातील असंतुलित “लिंगभाव गुणोत्तर’ या न सुटलेल्या कोड्याचा हा केवळ एक भाग आहे. यामागची कारणे शोधून काढण्यास संशोधनाला मोठी संधी आहे, हे मात्र नक्की.
याखेरीज, भारतीय समाजाचा आधारस्तंभ असलेली स्त्री स्वतःच्या एकूणच आरोग्याबाबत तितकीशी सजग नाही.
दरवर्षी दिनांक 28 मे रोजी “इंटरनॅशनल डे ऑफ ऍक्शन फॉर वूमेन्स हेल्थ’ साजरा होतो. यानिमित्ताने जगभरात दररोज 800 स्त्रियांचा गरोदरपणा आणि बाळंतपणामध्ये मृत्यू होतो आणि यातील 20 टक्के स्त्रिया भारतातील आहेत, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. रक्तक्षय असलेल्या स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. संयम आणि सहनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीय स्त्री! या भारतीय स्त्रीच्या प्रतिमेचे भारतीय समाजामध्ये उदात्तीकरण झाले आहे ही बाब काही नवी नाही. दुर्दैवाने, शिक्षणाने देखील या तथ्यामध्ये फार काही बदल केला, असे म्हणता येणार नाही.
वाचकहो, भारतीय प्रबोधनाच्या काळात स्त्रीला स्वतःला तिच्या हक्कांची, समाजातील दुय्यम स्थानाची जाणीव नसणे हे स्त्रीच्या परिस्थितीचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण वाटते. अगदी त्याचप्रमाणे आजही स्त्री स्वतःचा सर्वांगीण विचार करत नाही किंवा प्रसंगी बाह्यपरिस्थिती तिच्या या विचारांवर हावी होते, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे लसीकरण मोहिमेमध्ये स्त्रियांचे कमी प्रमाणात होणारे लसीकरण यामागची कारणे शोधणे, त्यावर मंथन होणे आवश्यकच आहे. मात्र, याचे उत्तर केवळ स्त्रीसापेक्ष असेल, असे गृहीत धरून चालणार नाही. म्हणजे स्त्रीला लस घेण्यास संकोच वाटतो इतक्यावर थांबून चालणार नाही. त्यामागची तिची मानसिकता शोधावी लागेल.
स्त्री हा शेवटी समाजाचा अर्थपूर्ण भाग आहे. तिची परिस्थिती बदलायची असल्यास केवळ तात्पुरता विचार करण्याखेरीज सामाजिक अंगाने व्यापक विचार केल्यास तोडगा काढता येईल, अशी आशा बाळगूया. भारतीय कुटुंब पद्धतीचे महत्त्व पुनश्च: अधोरेखित होत असताना आणि एकीकडे लसीकरण मोहीम सुरू असताना प्रत्येक कुटुंबाच्या पातळीवर स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, तिचा सर्वांगीण विचार करणारी छोटेखानी मोहीम राबवायला हरकत नाही.