सिनेनिर्मात्यांचे व्यवसायसूत्र पाहिल्यास रसिकांना जे आवडतं, जे विकलं जातं त्याला प्राधान्य देणं हे असल्याचं लक्षात येईल. हॉलीवूडमध्ये सायन्स फिक्शनना जशी पसंती असते तसे आपल्याकडे प्रेमकथा, रहस्यकथा, गूढकथा, विनोदी, गुन्हेगारी अशा विषयांना प्रेक्षकांची पसंती असल्याचे दिसते. यामध्ये राजकारणावर आधारित चित्रपटांचा स्वतंत्र ठसाही दुर्लक्षिता येणार नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत राजकारणातील दिग्गजांवरही चित्रपट बनवले गेले. त्यांचाच हा लेखाजोखा…
चित्रपटांचा जनमानसावर सखोल परिणाम होतो हे सर्वश्रुत आहे. राजकारणही त्याला अपवाद नाही. राजकारण, राजकारणी आणि राजकीय व्यवस्था-अव्यवस्था यांच्याशी संबंधित चांगल्या-वाईट घटनांवर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनविले गेले. काही ठिकाणी राजकीय व्यक्तींवर गाणी लिहिली गेली आणि गायलीही गेली. अनेक चित्रपटांच्या कथा काल्पनिक असल्याचा दावा केला जात असला तरी चित्रपटांवर अनेक आरोप होत राहिले आणि वादही निर्माण झाले.
राम मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला “लीडर’ हा एक पॉलिटिकल ड्रामा होता. 1964 मध्ये तो प्रदर्शित झाला. “अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं’ हे या चित्रपटातील गाणे आजही लोक विसरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत धनाढ्य लोक कशाप्रकारे एक डमी उमेदवार उभा करतात आणि देशासाठी सर्वस्व कुर्बान करणाऱ्याला आपल्या मार्गातून कसा दूर करतात, याचे चित्रण या चित्रपटात होते. चित्रपटात वैजयंती माला, दिलीपकुमार आणि जयंत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1975 मध्ये गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला “आँधी’ चित्रपट प्रदर्शित झाला.
राजकीय क्षेत्रात चर्चेत राहिलेल्या या चित्रपटातील गाणीही खूप लोकप्रिय झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनातील काही घटनांचे या चित्रपटातील काही प्रसंगांशी असलेले साधर्म्य हा त्यावेळच्या चर्चेचा विषय होता. कॉंग्रेसने या चित्रपटाला विरोध केला आणि काही महिन्यांनंतर या चित्रपटावर बंदी आली. त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात सुचित्रा सेन आणि संजीव कुमार हे प्रमुख कलावंत होते. “आँधी’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
यानंतर काही वर्षांनी आलेला “किस्सा कुर्सी का’ हा चित्रपटही वादग्रस्त ठरला. दिग्दर्शक होते खासदार अमृत नाहटा. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत हा चित्रपट मोठा मुद्दा ठरला. 1974 मध्ये हा चित्रपट झळकला आणि 1975 मध्ये त्यावर बंदी आली. 1977 मध्ये राजकिरण, सुरखा सिक्री आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये या चित्रपटाचा “रिमेक’ झळकला. 1993-94 च्या सुमारास केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला “सरदार’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. त्यांची कथा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटावर आधारित होती. भारतीय राजकारणातील त्यांची भूमिका चित्रपटात विशद करण्यात आली होती. परेश रावल यांनी सरदार पटेलांची भूमिका केली होती.
राजकारणावर आधारित चित्रपटांची यादी “नायक’शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हा चित्रपट बहुतांश सर्वांनी पाहिला असेल. राजकारणासह व्यवस्थेतील भ्रष्टाचार, चालीरीती हा चित्रपट लोकांसमोर आणतो. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनिल कपूर, अमरीश पुरी आणि परेश रावल यांनी दमदार भूमिका केल्या होत्या. मुलाखतीदरम्यान एक पत्रकार मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारतो आणि एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो. त्याने एकाच दिवसात व्यवस्था साफ करण्यासाठी केलेले परिश्रम पाहून त्यालाच कायमस्वरूपी मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरते; परंतु नंतर या पत्रकाराला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. प्रदीर्घ संघर्षानंतर सत्याचा विजय होतो, असे हे कथानक होते.
राजकारणावरील मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेला “सत्ता’ चित्रपटही चर्चेत आला. 2003 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. राजकारणाचे जे पैलू लोकांपासून लपलेले असतात तेच या चित्रपटात उलगडून दाखविले आहेत. भ्रष्ट राजकारणी, अंडरवर्ल्ड, उद्योगपती आणि भ्रष्ट पोलीस कर्मचारी यांचे अंतरंग या कथेतून उघड होतात. चित्रपटाच्या कथेत अनुराधा ही मुलगी नोकरीच्या शोधात दिल्लीहून मुंबईला येते. ती विवेक चौधरी यांना भेटते. तो लवकरच मुख्यमंत्री बनतो. दोघांमध्ये प्रेम फुलते आणि मग लग्न होते. त्यानंतर अनुराधाच्या पतीला हत्येप्रकरणी तुरुंगात जावे लागते आणि तिलाच राजकारणात उतरावे लागते. या चित्रपटात रवीना टंडन, अतुल कुलकर्णी, गोविंद नामदेव यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
राजकारणावरील चित्रपटांच्या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचा “सरकार’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो. पॉलिटिकल क्राइम थ्रिलर असे त्याचे वर्णन करता येईल. 2005 मध्ये हा चित्रपट पडद्यावर झळकला. त्यात एक प्रभावशाली व्यक्ती सरकारवर खुनाचा खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबते आणि त्यानंतर त्याचा मुलगा त्याची जागा घेतो असे चित्रपटात दाखविले आहे. दिग्दर्शन होते रामगोपाल वर्मा यांचे. “सरकार राज’ नावाने त्या चित्रपटाचा सीक्वेलदेखील आला. या यादीतील पुढचे नाव प्रकाश झा दिग्दर्शित “राजनीती’ या चित्रपटाचे असून, चित्रपटाची कथा राजकीय तसेच कौटुंबिक आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी आणि कतरिना कैफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. कथेत एका राजकीय कुटुंबातील मुलगा अमेरिकेत शिकत असतो. त्याचा राजकारणाशी संबंध नसतो; परंतु परिस्थितीमुळे त्याला भारतात परतावे लागते आणि अनिच्छेने तो राजकारणात सक्रिय झाल्यानंतर शह आणि काटशहाचे राजकारण सुरू होते.
“पीपली लाइव्ह’ हा चित्रपटही राजकीय थीमवरच बेतलेला आहे. विडंबनाचा आधार घेऊन तीव्र राजकीय भाष्य या चित्रपटात करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे झालेले राजकारण हा विषय या चित्रपटात हाताळलेला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देणे सरकार कसे टाळते, हे या चित्रपटात दर्शविले आहे. या चित्रपटाची निर्मिती आमीर खान यांची असून अनुषा रिझवी यांनी पटकथा लिहून दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटात रघुवीर यादव, नवाजुद्दीन सिद्दीकी, मलाइका शेणॉय आणि अनेक नवीन कलावंतांनी अभिनय केला आहे.
2016 मध्ये तयार झालेली “ऍन अन्सिग्निफिकन्ट मॅन’ ही डॉक्युमेन्टरी असली तरी राजकीय चित्रपटांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी केले आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर अस्तित्वात आलेल्या आम आदमी पक्षाच्या प्रवासावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर कथानक केंद्रित आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओमंगकुमार दिग्दर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्रपटाचा उल्लेख या यादीत अनिवार्य आहे. 2019 च्या लोकसभा निवड़णुकीच्या निकालानंतर लगेचच “पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. निवडणुकीच्या पूर्वीच तो प्रदर्शित होणार होता; मात्र आचारसंहिता लागू असल्याने विरोधकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे तत्काळ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आले.