निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा असलेल्या आणि आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकप्रिय हिंदी व मराठी गायिका सुमन कल्याणपूर यांचा आज वाढदिवस. त्यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन पूर्व बंगाल) शहरात ढाका येथे झाला. सुमन कल्याणपूर यांचे वडील शंकरराव हेमाडी हे मूळचे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यात हेमाडी गावचे. ते सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये उच्चपदावर बराच काळ ढाका येथे कार्यरत होते. वडील आणि आई सीता हेमाडी व्यतिरिक्त, कुटुंबात पाच मुली आणि एक मुलगा होता, सुमन त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. वर्ष 1943 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईला गेले आणि सुमनताईंनी मुंबईतील प्रसिद्ध सेंट कोलंबा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला.
सुमनताईंना चित्रकला आणि संगीताची आवड होती. त्यांनी प्रभात फिल्म्सचे संगीत दिग्दर्शक आणि जवळचे कौटुंबिक मित्र पंडित केशवराव भोळे यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात केली. तसेच उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. त्यांची धाकटी बहीण श्यामा हेमाडी ही गायिका होती. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यावर त्या सुमन कल्याणपूर या नावाने परिचित झाल्या. बंगाली, ओडिशा, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपुरी या भाषांमधील गाणीही त्यांनी म्हटली. गझल, ठुमरी, भक्तिगीते यात त्यांना जास्त गोडी होती.
सुमन कल्याणपूर यांचे हिंदीमधे पार्श्वगायिका म्हणून, गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळे प्रवेश झाला. एका गाण्याच्या कार्यक्रमात तलत यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज ऐकला आणि ते भारावूनच गेले. तलत यांनी त्यांची एचएमव्ही म्युझिक कंपनीकडे शिफारस केली. वर्ष 1954 मधे अवघ्या 17व्या वर्षी मंगू या चित्रपटासाठी “कोई पुकारे धीरे से तुझे’ या गाण्याचे त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदीतील सर्व आघाडीच्या संगीतकारांबरोबर 740 हून अधिक फिल्मी आणि बिगर फिल्मी गाणी गायली. महंमद रफी यांच्यासोबत 140 हून अधिक युगल गीते गायली. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, ना-ना करते प्यार, तुम रुठो ना हसीना, रहे ना रहे हम, परबतें के पेडों पे शाम का बसेरा ही रफी यांच्यासोबतची त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
वर्ष 1956 मध्ये “दिसतं तसं नसतं’ या चित्रपटासाठी त्यांनी “भातुकली उधळली अचानक’ हे वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत पहिल्यांदा गायले. त्यानंतर त्यांची सुमारे 155 मराठी गाणी ध्वनिमुद्रित झाली. सुमनताईंनी “जिथे सागरा धरणी मिळते’, “घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’, “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’, “कशी गवळण राधा बावरली’ “केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर’, “केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’, “देव माझा विठू सावळा’, अशी अवीट मराठी गाणी गायली. गानसम्राज्ञीला दीर्घायुरोग्य लाभो याच शुभेच्छा.