बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या तेजस्वी यादव यांचे नाव पुढे करताना दिसून येतात. मात्र, नितीश यांची प्रत्येक चाल वेगळी असू शकते. ते इतक्यात राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याने त्यांची पुढील अनेक गणिते तयार असतील.
संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत भाजपला पर्याय म्हणून नवी आघाडी स्थापन करण्याची चाचपणी करत आहेत. आपण पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाही असाही त्यांचा दावा आहे. त्याचवेळी बिहारच्या राजकारणात लालूपुत्र तेजस्वी यादव यांना पुढे आणण्याचा नितीश यांचा प्रयत्न असल्याचे दिसते आहे. नितीश यांनी काही वेळा जाहीरपणे त्याचे सूतोवाच केले आहे. वरकरणी ही बाब नितीश यांचे मोठेपण दर्शवणारी भासत असली, तरी प्रत्यक्षात तसे नाही. नितीश यांची त्यामागे पुढची गणिते आहेत व ते काही राजकारणातून जाणार नाहीत, असेच आता राजकीय रणनीतिज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत प्रशांत किशोर यांनीच एक तर्क मांडला आहे. त्यानुसार 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीश तेजस्वी यांचे नाव पुढे करत आहेत हे खरे आहे. मात्र तेजस्वी यांच्या मर्यादांची त्यांना चांगली कल्पना आहे. तेजस्वींकडे बिहारची सूत्रे गेली तरी बिहारचे मोठे नुकसान होणार आहे, याची नितीश यांना खात्री आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाकडे गेलेला मतदार पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाकडे वळेल अर्थात आपल्याकडेच येईल व आपल्याला संधी राहील अशी त्यामागे नितीश यांची अटकळ आहे. ते खरेही आहे कारण गेल्या काही दिवसांत विशेषत: संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल एकत्र आल्यापासून बिहारमधील नेते विशेषत: राजदचे नेते जी मुक्ताफळे उधळत आहेत त्यावरून हा पक्ष पुन्हा आपल्या जुन्या यादवीच्या मार्गाने जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लालू यांच्या कुटुंबाशी आपली निष्ठा दाखवण्याची चढाओढच राजदच्या काही नेत्यांमध्ये सुरू आहे. गंमतीचा भाग असा की आपल्या श्रेष्ठींवर स्तुतिसुमने उधळताना ही मंडळी नितीश यांचाच तेजोभंग करू लागली आहेत. तरी लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप बऱ्याच काळापासून गप्प आहेत. त्यामुळे तेजस्वी यांना काहीसा दिलासा आहे. अन्यथा केवळ तेजप्रताप यांनाच नियंत्रणात ठेवणे तेजस्वी यांच्यासाठी अवघड बनेल.
नितीश यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दिल्लीतील सत्तेत स्वारस्य नाही ते खरे असू शकेल. त्यांचे वय आणि केंद्रात नवे सरकार स्थापन करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा आवश्यक असलेले संख्याबळ या सगळ्या नितीश यांच्यासाठी जर तरच्या गोष्टी आहेत. बिहारमध्ये राहण्यातच आणि मुख्यमंत्रिपदावर राहण्यातच त्यांना रस आहे, असाही किशोर यांचा निष्कर्ष आहे. तसे जर असेल तर मग नितीश यांनी अचानक भाजपची साथ सोडून राजदशी घरोबा का केला, या प्रश्नाचेही उत्तर आहे. ते म्हणजे 2020 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश यांची ताकद निम्म्यापेक्षा जास्त घटली आहे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील शिवसेनेचा अनुभव घेतला होता. मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्यामुळे राज्यातील सत्तेवरच महाराष्ट्रात भाजपला पाणी सोडावे लागले होते.
बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती व्हावी अशी भाजपची तेव्हा मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे सत्तेतील जास्तीत जास्त वाटा उचलत भाजपने मुख्यमंत्रिपदाची माळ नितीश यांच्याच गळ्यात टाकली. नितीश यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती राजकारणात नाही. त्यांच्या मुलाला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. एकप्रकारे त्यांचा कोणी राजकीय वारस नाही. नाही म्हणायला त्यांच्या संयुक्त जनता दलात काही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या आहेत, हे खरे. पण या नेत्यांना सर्वमान्यता नाही. किंबहुना संपूर्ण राज्याचा नेता अशी त्यांची प्रतिमाही नाही. स्थानिक पातळीवर कितीही संस्थानिक निर्माण झाले तरी राज्याचे नेतृत्व करताना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून संबंधित नेत्याला स्वीकारार्हता असली पाहिजे ही पहिली अट असते. या सगळ्याचा सार एवढाच की नितीश यांना मुख्यमंत्रिपदावर राहू देण्यामागे भाजपची हीच दूरदृष्टी होती.
नितीश का बाहेर पडले?
नितीश यांनी 2025 च्या निवडणुकीचा विचार करूनच भाजपशी काडीमोड घेतला. कमी संख्याबळ असूनही भाजपने आपल्याकडे राज्याचे नेतृत्व दिले असले तरी ही तात्पुरती व्यवस्था आहे. शिवाय आपली शक्ती क्षीण झाली असल्यामुळे भाजप राज्यात वरचढ ठरतोय, निर्णय प्रक्रियेत जरी शिक्का आपला चालत असला तरी अंतिम शब्द आपला नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. ही मेहेरबानी लवकरच संपणार हेही त्यांना उमगले होते. भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करतोय. एकदा लोकसभेचा हत्ती मांडवाखालून निघून गेला की भाजपची वक्रदृष्टी सगळ्यांत प्रथम आपल्यावर पडेल हे सुशासन बाबूंना उमगले नसणार असे मानणे म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण. ज्या राज्यांत संख्याबळ नाही तेथे भाजप ऑपरेशन लोटस करते. येथे तर पुरेसे संख्याबळ असताना लोटस चालवायला भाजपला कितीसा वेळ लागणार? त्या स्थितीत संयुक्त जनता दलच इतिहासजमा होण्याचा धोका अधिक. ही सगळी गणिते नितीश यांनी पुन्हा पुन्हा मांडणी करून तपासलीच असणार. त्यातूनच त्यांनी भाजपलाच बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मार्ग पत्करला.
त्यातून नितीश यांना दोन बाबी साधता आल्या. नवा मित्र सत्तेत आल्यामुळे सरकारविरुद्धच्या नाराजीला थोपवता आले. दुसरे म्हणजे नितीश यांनी राष्ट्रीय जनता दलाला अचानक सत्तालाभ करून दिल्यामुळे त्यांना कथित महागठबंधनमध्ये पुन्हा सगळ्यांत मोठी भूमिका मिळाली. अनुभव आणि ज्येष्ठत्व या दोन्ही बाबतींत नितीशच आज महागठबंधनमध्ये अंतिम शब्द सांगणारे नेते ठरले. शिवाय या नव्या मांडणीमुळे त्यांना लोकसभेत फायदाच होण्याची दाट शक्यताही आहे. सर्व बाजूंनी विचार करता नितीश यांच्यासाठी ही “विनविन सिच्युएशन’च आहे. अधूनमधून तेजस्वी यांच्या नावाला हवा दिल्यामुळे तेजस्वी आजच मुख्यमंत्री होणार नाहीत. पण राजदमध्ये त्यामुळे उत्साह नक्कीच संचारू शकतो व तोही नितीश यांच्याच पथ्यावर पडणार.
शेवटी राजकारणात तत्कालिक आणि दूरगामी विचार करूनच आघाड्या आणि युती केल्या जातात. त्यात विरोधकांना नामोहरम करणे आणि सत्ताप्राप्ती हे जरी इप्सित असले तरी आपला मित्रही आपल्या वरचढ ठरणार नाही. तो आपल्या अंकीत राहील किंवा जर तो मोठा असेल तर आपल्याशिवाय त्याला पर्याय राहणार नाही अशी स्थिती तपासली जाऊनच नवे मित्र जोडले किंवा तोडले जात असतात. नितीश त्यात वाकबगार आहेतच. त्यांनी बिहारमध्ये जॉर्ज फर्नांडिस त्यांचे नेते असल्यापासून या सगळ्या उड्या मारल्या आहेत. त्यामुळे तिसरी आघाडी आणि पंतप्रधान पद हे दाखवले जाणारे चित्र. खरे दात वेगळेच आहेत.