अहिल्याबाई यांचे कार्य केवळ एका राज्यापुरते, देशापुरते मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. त्या पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता आहेत. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या प्रेरणेने देशभर मराठा साम्राज्य निर्माण झाले. अनेक कर्तृत्ववान घराण्यांनी पराक्रम गाजविला. त्यापैकी इंदौरचे होळकर हे पराक्रमी, लोकल्याणकारी आणि लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक, मुत्सद्दी महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर. पतीनिधनानंतर सती न जाता होळकरांच्या साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचे महान कार्य अहिल्याबाईंनी केले. त्यांच्या जीवनात दु:खांची मोठी मालिका आहे. पती खंडेराव होळकर हे कुंभेरीच्या वेढ्यात लढता-लढता धारातीर्थी पडले (1754). उत्तर भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे निधन झाले (1766). एकुलता एक पुत्र मालेराव अकाली गेले (1767). जावई यशवंतराव फणसे (1791), कन्या मुक्ताबाई (1791) साली मृत्यू पावले. इतके सर्व दु:ख पचवून लोककल्याणासाठी अहिल्याबाई आयुष्यभर लढत राहिल्या. संकटाने नाउमेद न होता त्यांनी हिमतीने राज्यकारभार केला.
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे सीना नदीकाठावरील त्यांचे गाव. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याबरोबर पुणे येथे झाला. अहिल्याबाई बालपणापासूनच अत्यंत हुशार, हजरजबाबी, विनयशील, तितक्याच स्वाभिमानी आणि दयाळू होत्या. मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी त्यांना मुलीप्रमाणे सांभाळले. अहिल्याबाईंचा दरबारातील अधिकाऱ्यांवर मोठा वचक होता. त्यांनी उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. रयतेवर अन्याय होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवला. त्यांचे आधुनिकीकरण केले. शस्त्रास्त्रसाठा सुसज्ज ठेवला. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होते.
पुत्र मालेरावांचे निधन झाल्यानंतर पुण्याचे राघोबादादा इंदौरचे राज्य गिळंकृत करण्यासाठी निघाले, तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना ठणकावून सांगितले, “आमचे दौलतीची अभिलाषा धरून सेनेसह आपण चालून आलात हे समजल्यावर बहुत कष्ट होत आहेत. पण ही दौलत आमच्या बापजाद्यांनी खुशमस्करी करून नव्हे, पराक्रम गाजवून मिळवलेली आहे. दान म्हणून मागत असाल तर दान धर्माचा वाटा मिळेल; पण युद्ध करून सर्व दौलत (राज्यच) समेटावे म्हणाल तर त्यालाही आमची तयारी आहे. माझ्यासंगे दोनशे स्त्रियांची हत्यारबंद फौज आहे. मी बाईमाणूस मानू नका. खांद्यावर भाला टाकून उभी राहीन. माझा पराभव झाल्यास कुणी नाव ठेवणार नाही. उलट अटकेपार झेंडे लावणाऱ्याचा पराभव केला म्हणून माझी कीर्ती होईल, पण तुमचा पराभव झाला तर तुमचे सर्वत्र हसे होईल.’ अहिल्याबाईंचे करारी रूप पाहिल्यानंतर राघोबादादा पेशवा वरमला आणि मालेरावाच्या मृत्यूमुळे सांत्वन करण्यासाठी आलो आहे, असे उत्तर पाठवले. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या, “मग फौजेची गरज काय? एकटे पालखीत बसून यावे.’
वरील प्रसंगावरून स्पष्ट होते की, अहिल्याबाईंनी आक्रमणकारी पेशव्यांचाही मुलाहिजा बाळगला नाही. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून स्त्रीपणाचा न्यूनगंड बाळगला नाही. त्यांनी पुरुषांप्रमाणेच महिलांचे सैन्य देखील उभारलेले होते. त्या स्वत: युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपले राज्य टिकविले आणि वाढविलेदेखील. तुकोजी होळकर यांना सुभेदारी देऊन राजस्थानात मोहिमेवर पाठविले. स्वत: राज्याचा दौरा करून रयतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवली. शेतसाऱ्यात सवलती दिल्या. आपल्या राज्यात हुंडाबंदीचा हुकूम काढला. लग्नात हुंडा दिला-घेतला तर दंड आकारून ती रक्कम सरकारात भरणा करण्याची आज्ञा केली.
अहिल्याबाई धार्मिक होत्या; परंतु धर्मभोळ्या नव्हत्या. सती प्रथेला त्यांचा विरोध होता; परंतु धार्मिक दहशतवाद इतका कठोर होता की अनेक महिलांना सती जावे लागत असे. त्यांनी विधवांचा सन्मान केला. महिलांना सैन्यात संधी दिली. महिलाही शूर, पराक्रमी प्रशासक असतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आपल्या राज्यांत भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मीयांना अत्यंत मायेने वागविले. स्वत:च्या एकुलत्या एक कन्येचा-मुक्ताबाईच्या विवाहाबाबत त्यांनी एक घोषणा केली. “जो दरोडेखोर, गुंडांचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल, त्यांच्याबरोबरच मुक्ताबाईचा विवाह होईल.’ यशवंतराव फणसे यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त केला. तेव्हा अहिल्याबाईंनी मुक्ताबाईचा विवाह त्यांच्याबरोबर लावून दिला.
अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात आमूलाग्र बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमिनी देऊन त्यांच्या हाताला काम दिले. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि प्रवाशांवर नाममात्र संरक्षण कर लावला आणि त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. गुन्हेगारांना मारण्यापेक्षा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन दिले.
अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक वास्तूंचा जीर्णोद्वार केला. त्यांनी महेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, परळी वैजनाथ, श्रीशैलम्, तारकेश्वर (काशी), त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, चारधाम, रामेश्वर, जगन्नाथपुरी, द्वारका, जेजुरी, पंढरपूर, मथुरा, बद्री केदारनाथ, गया, आलमपूर, रेणुका मंदिर, चौडी, पुष्कर, उज्जैन इत्यादी ठिकाणी मंदिरे, घाट बांधले. यात्रेकरूंना नदीपात्रात उतरताना-चढताना, प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून देशात अनेक ठिकाणी त्यांनी घाट बांधले. राज्यातील उत्पन्न कौटुंबिक हितासाठी नव्हे तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या अहिल्याबाई या लोककल्याणकारी लोकमाता होत्या. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्या स्वकियांचा देखील त्यांनी बंदोबस्त केला. प्रशासनावर त्यांचा वचक होता. अनेक वेळा त्या स्वत: हिशेब तपासत असत. स्वत:च्या राज्याबरोबरच इतर राज्यांत देखील त्यांनी लोकोपयोगी कार्य केले.
अहिल्याबाईंनी इंदौरबरोबरच महेश्वर या ठिकाणी भव्य राजवाडा उभारला. अनेक देवालये आणि स्मृतिस्थळे उभारली. त्यांचे भव्य असे ग्रंथालय होते. त्यामध्ये देशविदेशातील असंख्य दुर्मिळ ग्रंथ होते. त्यांनी अनेक गुणीजनांना राजाश्रय दिला. त्यांचे कौतुक केले, बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. अनंत फंदी यांना “कविराज’ हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. गुणीजनांचा सन्मान करणे, त्यांना आधार देणे, याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्या जशा करारी होत्या तशाच त्या दयाळू होत्या. त्यांनी सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. त्यांनी नि:पक्षापाती असा न्यायनिवाडा केला. त्या न्यायनिष्ठूर होत्या. यशप्राप्तीसाठी पराक्रम गाजवावा लागतो, याची जाण असणाऱ्या वास्तववादी, प्रयत्नवादी राज्यकर्त्या होत्या. त्या यशाने हर्षभरित होणाऱ्या आणि दु:खाने नाउमेद होणाऱ्या नव्हत्या.
स्त्रीसुद्धा हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी, करारी, शूर, उत्तम राज्यकर्ती असते हे अहिल्याबाईंनी दाखवून दिले. अशा कर्तृत्ववान लोकमाता अहिल्याबाईंचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वर येथे झाला.