आपण “यूजर’ असतो म्हणजे नक्की कोण असतो? काय “यूज’ करतो आपण? 1992-93 नंतर आपल्यातला “नागरिक’ हळूहळू लहान होत गेला आणि “यूजर’ मोठा होत गेला. या प्रक्रियेनं आपल्याला आत्मकेंद्री बनवलं. मग सोशल मीडिया आला आणि आपण पक्के “यूजर’ बनलो. या शब्दाचं भाषांतर सामान्यतः “वापरकर्ता’ असं केलं जातं. वस्तू कोणतीही असो, तिची बाजारपेठ आपल्यासारख्या “एन्ड यूजर’वर अवलंबून असते.
आपण प्रदूषणाचा विचार करून मोटारी खरेदी करणं कमी केलं, तर ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत मंदी येईल. सिमेंटच्या अतिवापरामुळे तापमानवाढ होते म्हणून आपण सेकंड होम, थर्ड होम वगैरे खरेदी करणं बंद केलं तर रिअल इस्टेट क्षेत्र कळवळू लागेल. आपण राजे आहोत. आपल्यावर सगळं अवलंबून आहे. आपण वाचनच केलं नाही तर आपल्या गावात पुस्तकाचं चांगलं दुकान कुणी काढणारच नाही. कारण पुस्तक लिहिणाऱ्यांना “वाचक’ हवा असला तरी दुकानदाराला “ग्राहक’ हवा असतो. वाचक कमी झाला म्हणून ग्राहक कमी झाला आणि मग ई-बुक्स वगैरे सुरू झाली. पुस्तक वाचून दाखवणारी ऍप्स मोबाइलमध्ये आली. पण खरं सांगायचं तर आपल्यातला “यूजर’ तिथेही रमला नाही. पुस्तक वाचण्याऐवजी ऐकण्याला कमी वेळ लागत असेल कदाचित; पण पुस्तक ही मुळातच आपली आत्यंतिक गरज राहिलेली नाही. जगण्यात चार्म पाहिजे, ऍक्शन पाहिजे, स्पीड पाहिजे…
मुख्य म्हणजे जगण्यात आक्रमकता पाहिजे… जोश पाहिजे आणि डोक्यातली हिंसा व्यक्त करायला जागा पाहिजे. आपली ही निकड सोशल मीडियानं पूर्ण केली. एखाद्या प्रसंगी एखाद्या व्यक्तीवर वस्कन ओरडावं, अंगावर धावून जावं, ही जी आपली सुप्त इच्छा सभ्यतेच्या वगैरे कारणामुळे दबली गेली होती, ती सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्यातून ओढून बाहेर काढली. नसानसात भरलेल्या द्वेषभावनांना मोकळं रान मिळालं. या प्रक्रियेत एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे “यूजर’ बदलला. आपला वापर करून गर्दी जमा करणारे “यूजर’ झाले आणि मूळचा “यूजर’ मात्र खेळणं बनला. त्याचाच वापर करण्याचा खेळ सुरू झाला.
अरेला कारे म्हणण्याची ज्यांची वृत्ती अधिक बळावली, त्यांच्याविरुद्ध तक्रारी झाल्या आणि संबंधित सोशल मीडिया कंपनीनं त्यांना मंचावरून काढून टाकलं. द्वेषयुक्त, आक्रमक, हिंसक कंटेन्टची आकडेवारी देणं कंपन्यांना भाग पडलं. फेसबुकवर अशा कंटेन्टमध्ये 37.82 टक्के वाढ झाली तर इन्स्टाग्रामवर हिंसक कंटेन्ट तब्बल 86 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलंय. यात पुन्हा गंमत अशी की, कुठल्याही अन्य यूजरने “रिपोर्ट’ करण्यापूर्वीचा हा आकडा आहे. प्लॅटफॉर्मने स्वतः गाळून बाजूला काढलेला कंटेन्ट! का असे हिंसक बनत चाललोय आपण… आणि कुणासाठी?
अन्य वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी आणि कायद्यांचं, सेवाशर्तींचं उल्लंघन या कारणासाठी एप्रिल महिन्यात व्हॉट्सऍपने साडेसोळा लाखांपेक्षा अधिक भारतीयांची खाती बंद केली. मध्यस्थ कंपनीसाठी आचारसंहिता आहे म्हणून! आपली वाढत असलेली आक्रमकता, हिंसक वृत्ती हा चिंतेचा विषय आहेच; पण कळीचा प्रश्न की या खेळात खरा “यूजर’ कोण..? आपल्याला मत आहे आणि ते मांडण्याचा अधिकारही आहे; पण कुठलाही फायदा नसताना आपण एवढे आक्रमक कुणाच्या इशाऱ्यावरून होत चाललोय?