हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गुरूवारी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुबळे करण्याचे कारस्थान मोदी सरकार करत आहे. तेलंगणाशीही भेदभाव केला जात आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली.
तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केसीआर बोलत होते. मजबूत केंद्र-दुबळी राज्ये असे संकुचित तत्व मोदी सरकारने अवलंबले आहे. केंद्र सरकारकडून लावल्या जाणाऱ्या करांमधील हिस्सा राज्यांना द्यावा लागतो. मात्र, तो हिस्सा राज्यांना मिळू नये यासाठी मोदी सरकार कारस्थान करत आहे. ते सरकार लाखों कोटी रूपयांचा राज्यांचा हिस्सा लाटत आहे.
राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आक्रमण केले जात आहे. मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी वीज सुधारणा लागू करण्यास तेलंगणाने विरोध दर्शवला. त्यामुळे तेलंगणाला दरवर्षी 5 हजार कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशात सध्या द्वेषाचे राजकारण सुरू आहे. ते देशाला शंभर वर्षे मागे घेऊन जाईल. सध्या केवळ धार्मिक मुद्द्यांवर चर्चा सुरू दिसते. जनतेच्या गरजा मागे पडल्या आहेत. जातीय दंगलींमधून राजकीय लाभ मिळवण्याचे प्रयत्न धोकादायक स्वरूपाचे आहेत, असा इशाराही केसीआर यांनी दिला.