राष्ट्रसंत, जैन धर्मगुरू आचार्य आनंदऋषीजी यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 27 जुलै 1900 रोजी (श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके 1822) चिचोंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचे मूळ नाव नेमीचंद देवीचंदजी गुगळे.
वयाच्या 13 वर्षी नेमीचंद यांनी आपले सर्व आयुष्य जैन धर्मासाठी व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. 7 डिसेंबर 1913 (मार्गशीर्ष शुक्ल नवमी) रोजी त्यांचा दीक्षा संस्कार (अभिषेक) अहमदनगर जिल्ह्यातील मिरी येथे झाला. आचार्यरत्न ऋषीजी महाराज यांनी त्यांना दीक्षा दिली. त्यानंतर त्यांना “आनंदऋषीजी’ हे नाव देण्यात आले. त्यांनी पंडित राजधारी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत आणि प्राकृत स्तोत्रे शिकण्यास सुरुवात केली. वर्ष 1920 मधे त्यांनी अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले. ते बहुभाषी होते. संस्कृत, प्राकृत बरोबरच त्यांना मातृभाषा मराठी, इंग्लिश, उर्दू, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा उत्तम येत होत्या.
रत्न ऋषीजी महाराज यांच्यासोबत आनंदऋषीजींनी जैन धर्मातील आचारविचार यांचे महत्त्व सांगणारे प्रवचन करण्यास सुरुवात केली होती. वर्ष 1927 मध्ये अलीपूरमध्ये गुरूरत्न ऋषीजी महाराजांचे निर्वाण (संथारा) झाले. गुरूंच्या निधनामुळे ते व्यथित झाले. पण ते आपल्या गुरूंचे शब्द विसरले नाहीत. हिंगणघाट येथे आपल्या गुरूंशिवाय त्यांचा पहिला चातुर्मास त्याच वर्षी पार पडला. ते जैन धर्मीय दिवाकर चुथमलजी महाराज यांच्याबरोबर धार्मिक चर्चा करत असत. दिवाकरांना आनंदऋषीजींची बुद्धिमत्ता भावली. आनंदऋषीजींकडे “आचार्य’ बनण्याची क्षमता आहे याची त्यांना खात्री वाटली. ही गोष्ट त्यांनी सर्व श्रावकां (अनुयायी)पर्यंत पोचविली.
त्यानंतर आनंदऋषीजींनी श्रावकांना लाभ देण्यासाठी अनेक प्रवचन कार्यक्रम सुरू केले. 25 नोव्हेंबर 1936 रोजी घोडनदी येथे चातुर्मासासाठी आले असताना त्यांनी तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा मंडळाची स्थापना केली. वर्ष 1952 मधे राजस्थानमधील सादरी येथे साधू संमेलनात आनंदऋषीजींना जैन श्रमण संघाचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. वर्ष 1953 मध्ये राजस्थानमधील अजमेर येथे अनेक नामवंत जैन साधू एका सामान्य चातुर्मासासाठी एकत्र आले. 13 मे 1964 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे (फाल्गुन शुक्ल एकादशी) रोजी आनंदऋषीजी श्रमण संघाचे दुसरे आचार्य बनले.
भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आनंदऋषीजींनी केले. जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण यांची सांगड घालणे हे त्यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यासाठी त्यांनी अन्य धर्मांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या प्रवचनांमध्ये महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज तसेच भारतातील गुरूनानक, संत कबीर, तुलसीदास, नरसी मेहता, महंमद पैगंबर यांच्या कवनांचा व वचनांचाही उल्लेख असायचा.
आपलाच धर्म श्रेष्ठ हा हेका त्यांनी कटाक्षाने टाळला. खुद्द जैन धर्मातील सर्व पंथांनी संघटितरीत्या धर्मकार्य करावे, तसेच धर्मकार्याचा केंद्रबिंदू हा देशकार्याचा, सर्वसामान्यांच्या उत्थानाचाच असावा अशी त्यांची शिकवण होती. धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे ही मानवकल्याणाची शिकवण दिली.
28 मार्च 1992 रोजी त्यांचे अहमदनगर येथे निर्वाण झाले. ऑगस्ट 2002 मधे भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले.