-हेमंत देसाई
बिहारमधील विधानसभा निवडणुकांनंतर एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसशी भाजपची गाठ असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी पूर्णतः कमजोर झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत मुख्यतः अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तृणमूलपुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे. बिहारचा वचपा तेथून जवळच असलेल्या प. बंगालमध्ये काढायचा, असा चंग भाजपने बांधला आहे. बिहारप्रमाणेच प. बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मिदनापूर जिल्ह्यातील हल्दिया या शहरात घेण्यात आलेल्या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही हिंदू-मुस्लीम असा भेद करत नाही. हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांनाही तेच व तेवढेच हक्क आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा सर्व धर्मीयांना मिळत आहे. तृणमूलप्रमाणे आम्ही भेदाभेदाचे राजकारण करत नाही.
घोष यांच्या मते, कॉंग्रेस, कम्युनिस्ट व तृणमूल यांनी मुस्लिमांना एखाद्या मतपेढीप्रमाणे मानले व त्यांना गरीब, अशिक्षित व बेरोजगार स्थितीत ठेवले. वास्तविक यापूर्वी घोष यांनी अनेक आततायी व विद्वेषी वक्तव्ये केलेली आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण 294 जागांपैकी 200 जागा भाजप जिंकेल, असा आत्मविश्वास त्यांना वाटतो. सत्तेवर आल्यानंतर तृणमूलने भाजपच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या 28 हजार केसेस मागे घेण्यात येतील, असे आश्वासनही घोष यांनी दिले आहे. भाजप अधिकाधिक आक्रमक होत असतानाच, तृणमूल कॉंग्रेसला मात्र अंतर्गत प्रतिकूलतेशी सामना करावा लागत आहे.
माजी खासदार आणि राज्याचे परिवहन मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बंडखोरी केली आहे. 2007 साली ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममध्ये भूमी अधिग्रहणविरोधी आंदोलन केले होते आणि त्याची सूत्रे शुभेंदू यांनी हलवली होती. या आंदोलनामुळेच डाव्या आघाडीची 34 वर्षांची सत्ता संपुष्टात आली होती. त्यांनीच आता उघड उघड बंड केले आहे. गेल्या तीनचार महिन्यांत शुभेंदू यांनी काही मंत्रिमंडळ बैठकीस हजेरी लावलेली नाही. “आमार दादार अनुगामी’ या बॅनरखाली त्यांनी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मला कोणत्याही पदाची आकांक्षा नाही, मला फक्त लोकसेवा करायची आहे, असे पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे भाषण करताना त्यांनी सांगितले. जेथे त्यांचे भाषण झाले, त्या ठिकाणी तृणमूलचे एकही बॅनर लागले नव्हते. या सभेत त्यांनी ममतादीदींचा एकदाही उल्लेख केला नाही.
शुभेंदू यांनी भाजपशी संपर्क साधला असल्याचे बोलले जाते. शुभेंदू हे पक्षशिस्त मोडत आहेत, अशी टीका तृणमूल कॉंग्रेसचे नेते करू लागले आहेत. शुभेंदू यांचे वडील शिशिर हे माजी केंद्रीय मंत्री असून, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आहेत. मी अथवा शुभेंदू यापैकी कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. आम्ही दीदींबरोबरच आहोत, असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्याचवेळी, भविष्यात काय होणार हे आताच सांगू शकत नाही, असेही त्यांनी म्हणून टाकले आहे.
पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, पुरुलिया आणि बांकुरा या चार जिल्ह्यांतील प्रभारीपद शुभेंदू यांच्याकडे होते. या जिल्ह्यांत मिळून लोकसभेच्या आठ व विधानसभेच्या 56 जागा आहेत. तृणमूलमधील अगदी मोजक्या नेत्यांपैकी शुभेंदू हे आहेत, ज्यांचा स्वतःचा जनाधार आहे. दीदींचे नाव न वापरता, ते स्वतः निवडून येऊ शकतात आणि अनेकांना निवडून आणू शकतात. शुभेंदू हे महत्त्वाकांक्षी नेते असून, 2014 मध्ये दीदींनी आपला भाचा अभिषेक याला पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष बनवले. शुभेंदू यांचे महत्त्व हळूहळू कमी करण्यात येऊ लागले. त्यामुळे खवळलेले शुभेंदू दीदींविरुद्ध आडूनआडून टीका करू लागले आहेत. करोनाच्या संकटात काही राजकारण्यांनी स्थलांतरित मजुरांना कोणतीही मदत केली नाही. संकट निवळल्यानंतर मात्र ते मतदारसंघांत येऊन लोकांना अन्नधान्य वाटू लागले. हे नेते आत्मकेंद्री आणि स्वार्थी लोक आहेत, अशी टीका शुभेंदू यांनी दीदींचे नाव न घेता, त्यांच्यावर केली.
तृणमूलमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्यासारखे असंख्य असंतुष्ट नेते आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. परंतु अधिकारी हे नारदा घोटाळ्यातील आरोपी असून, लाच घेताना ते कॅमेऱ्यासमोर पकडले गेले होते. सीबीआयने त्यांचे नाव लोकसभाध्यक्षांकडे खटला भरण्यास मंजुरी देण्याच्या दृष्टीने पाठवले होते.
शारदा चिटफंड घोटाळ्याबाबतही सीबीआय व सक्त वसुली संचलनालयाने त्यांची तपासणी केली होती. परंतु यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे क्रमांक दोनचे नेते मुकुल रॉय यांचेही नाव घोटाळ्यामध्ये होते. मात्र भाजपात आल्यावर ते पवित्र झाले. आता प. बंगालमधील भाजपची महत्त्वाची सूत्रे याच मुकुल रॉय यांच्याकडे आहेत. येत्या दोनतीन महिन्यांत भाजप, तृणमूल तसेच कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी करून आपले बळ वाढवणार, हे नक्की.