-वंदना बर्वे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घटका जवळ आली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत बिहारचा नवीन बादशाह कोण? हे स्पष्ट होईल.
“ही माझी शेवटची निवडणूक!’ या नितीशकुमार यांच्या भावनिक आवाहनाला बिहारवासीयांनी किती दाद दिली, याचा निकाल आज मंगळवारी लागणार आहे. नितीशकुमार आपलं सरकार कायम ठेवण्यात यशस्वी होणार की, तेजस्वी यादव बाजी मारणार? वा चिराग पासवानला पुढं करून भाजप सिंहासनावर बसणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज सायंकाळपर्यंत मिळालेली असेल.
एक मात्र नक्की की, 31 वर्षांच्या तेजस्वी यांनी नितीशकुमार यांच्यासह रालोआच्या सर्व नेत्यांना “सळो की पळो’ करून सोडलं यात शंका नाही.निवडणुकीत एकाचा विजय तर एकाचा पराभव हा ठरलेला आहे. मात्र, बिहारची निवडणूक राज्याचा नवीन मुख्यमंत्री ठरविण्यासोबतच भाजपप्रणित रालोआ नेत्यांच्या प्रभावाचेसुद्धा आकलन करणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं नेतृत्व तेजस्वी यादव यांनी केलं. सोबतीला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी होते. मात्र, बिहारमध्ये कॉंग्रेसची अवस्था काय आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
दुसरीकडे, रालोआचं नेतृत्व मुख्यमंत्री नितीशकुमार करीत होते. याशिवाय दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे होते. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची फौज मैदानात उतरली होती. एवढंच नव्हे तर, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत असला तरी हा पक्ष भाजपच्याच सावलीत निवडणूक लढत होता, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
निवडणुकीचा सारीपाट अशाप्रकारे रंगला असताना, एकट्या तेजस्वी यादव यांनी रालोआच्या सर्व नेत्यांना थुई-थुई नाचायला लावले होते, हे विसरून चालणार नाही. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव या निवडणुकीतील दोन मुख्य चेहरे. नितीशकुमार यांच्या तुलनेत तेजस्वी म्हणजे निस्तेज चेहरा. वय, ज्ञान, अनुभव यासर्व बाबतीत कमजोर. राष्ट्रीय जनता दलाचं सामाजिक समीकरणसुद्धा वेगळं. वडील लालूप्रसाद यादव तुरुंगात. अशात, एकट्या तेजस्वी यादव यांनी सर्वांना तगडी टक्कर दिली.
तेजस्वी यादव यांनी पारंपरिक पद्धतीप्रमाणे प्रचार न करता म्हणजे चेहऱ्यावर फोकस न करता मुद्द्यांवर भर दिला. जसे, कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. यामुळे विरोधकांची भंबेरी उडाली. केवळ आश्वासन नाही दिले तर नोकऱ्यांची निर्मिती कशाप्रकारे केली जाऊ शकते? याची सविस्तर माहिती दिली; परंतु, बिहारचे तरुण त्यांच्या या आवाहनाला फारशी दाद देणार नाही, असे नितीशकुमार यांना वाटले. म्हणून ते बिनधास्त राहिले. मात्र, तेजस्वी यांच्या सभांमध्ये गर्दी वाढताना बघून तेही अस्वस्थ झाले.
मात्र, नंतर तेजस्वी यांच्या आश्वासनाचा फुगा फोडण्यासाठी रालोआच्या नेत्यांनी दहा लाख नोकऱ्या देणं शक्य नाही कारण सरकारकडे बजेट नाही, असं सांगायला सुरुवात केली. नितीशकुमार यावर काही तरी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात होते तोच भाजपने तेजस्वीची नक्कल करीत 19 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली. यामुळे नितीशकुमार आणि भाजपची मोठी फजिती झाली. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात उभी झाली आणि तेजस्वी यांच्या आश्वासनाला राज्यव्यापी स्वीकारार्हता मिळाली. हा सगळा प्रकार घडला तो निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात.
पहिल्या टप्प्यात किरकिरी झाल्यानंतर रालोआने दुसऱ्या टप्प्यात सावधगिरीने पाऊल उचलायला सुरुवात केली. नितीशकुमार जनतेला चौफेर विकासाचे आश्वासन देऊ लागले. यात सोलर लाइटपासून गाव आणि कॉलेजपर्यंत सर्व बाबींचा समावेश होता; परंतु तेजस्वी यादव सव्वाशेर निघाले. त्यांनी “पढाई, कमाई, दवाई और सिंचाई’ची घोषणा दिली. सोबतच, “सुनवाई और कारवाई करनेवाली पहिली सरकार’ स्थापन करण्याचा दावा केला. दहा लाख नोकऱ्या देण्याच्या मुद्द्याने आधीच लोकांमध्ये प्रभाव निर्माण केला होता. त्यात या नवीन घोषणा. भाजपच्या हातात एकही मुद्दा राहिला नाही. भाजपने पहिल्या टप्प्यात करोना व्हॅक्सिनचा मुद्दा रेटून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी तो हवेत उडवून लावला.
तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान झाले. यात मुख्यत्वे सीमांचल आणि मिथिलांचल प्रदेशातील भागांचा समावेश आहे. बिहारमधील जवळपास निम्मे मुस्लीम लोक या क्षेत्रात राहतात. यात अरेरिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या भागांचा समावेश होतो. भाजपने या भागात तेजस्वी यादव यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला; परंतु नितीशकुमार यांनी भाजपच्या दाव्याचा फुगा फोडला. नितीशकुमार यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्याचा विरोध केला आहे. आता, रालोआ त्यांच्याच नेतृत्वात लढत आहे आणि त्यांनीच हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली दिली आहे. अशात, भाजपचा हा डावसुद्धा वाया गेला. याच कारणामुळे नितीशकुमार आणि भाजप आमनेसामने आले.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी अनेक जागांवर फक्त दोन नाही तर अधिकाधिक पक्षांचा सामना होणार आहे. उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी, ओवैसी यांची एमआयएम, मायावती यांची बसपा आणि माजी खासदार पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी रिंगणात आहेत.
2015 मध्ये 78 जागांपैकी 54 जागांवार जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस आघाडीला विजय मिळाला होता. तर एनडीएमधील भाजप, एलजेपी, आरएलएसपी आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाला 24 जागांवर विजय मिळाला होता. पण, यात सगळ्यात जास्त 19 जागा भाजपला मिळाल्या होत्या. यावेळेस महाआघाडीत जेडीयू नाही तर एलजेपी एनडीओतून बाहेर पडली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी भाजपनं 35, तर जेडीयूनं 37 उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. मुकेश सहन यांच्या विकासशील इन्सान पार्टीचेही पाच उमेदवारांनी ताल ठोकली होती. राजदनं 46, तर कॉंग्रेसनं 25 जागांवर उमेदवार दिले होते. नितीशकुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्री तिसऱ्या टप्प्यातील मतदानात उमेदवार म्हणून आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी सीमांचल भाग केंद्रस्थानी राहिला. इथं राजदचे पारंपरिक मतदार आहेत. यात यादव आणि मुस्लिमांचा समावेश होतो.
2010च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपनं 243 पैकी 206 जागांवर विजय मिळवला होता, पण सीमांचल आणि किशनगंज त्यांच्या हातातून निसटलं होतं. तेव्हा राजद आणि कॉंग्रेसला किशनगंजमधून 4 जागा मिळाल्या होत्या. गेल्या वर्षी किशनगंजमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमनं बिहारमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला होता. मिथिलांचलमधल्या दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, मधेपुरा, सहरसा, सुपौल आणि सीतामडी जिल्ह्यांतील 34 जागांवर मतदान झाले. गेल्या निवडणुकीत मिथिलांचलमधून भाजप फक्त 6 जागांवर विजयी झाली होती. त्यामुळे यावेळेस भाजपला इथं कडवं आव्हान आहे. यावेळी भाजपनं इथं राजनाथ सिंग, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ अशा स्टार प्रचारकांच्या सभा घडवून आणल्या आहेत.
दरम्यान, तेजस्वी यांनी मुद्द्यांच्या बाबतीत भाजप आणि जेडीयूला मागे टाकले आहे. रालोआची अवस्था एवढी बिकट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरासुद्धा भाजप आणि जेडीयूच्या कामी येताना दिसत नाही. परिस्थिती एवढी प्रतिकूल होत गेली की, “ही माझी शेवटची निवडणूक आहे’, असं भावनिक आवाहन नितीशकुमार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलं. यामुळे सर्व आश्चर्यचकित झाले. रालोआकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सांगितले जात आहे. यामुळे ही बाब आणखी महत्त्वाची झाली आहे.
हे सगळं खरं असलं तरी, तेजस्वी यांना लोकांची मते मतपेढीत उतरविण्यात कितपत यश आले, हे आज स्पष्ट होऊ शकेल. या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण देशाला आहे. एक मात्र खरे की, 31 वर्षांच्या या नेत्याने आपल्या मुद्द्यांच्या जोरावर स्वतःला केवळ नेता म्हणून प्रस्थापित केले नाही तर बिहारच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे.