-माधव विद्वांस
प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 31 जुलै 1872 रोजी चिपळूण येथे झाला. मराठी संतचरित्रकार, हरिभक्तपरायण, भागवतधर्मप्रचारक आणि रसाळ वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते.
त्यांचे मूळ घराणे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावचे. त्यांचे पूर्वज पुण्याजवळील पौड येथे स्थायिक झाले. लक्ष्मण पांगारकरांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी. तथापि, लक्ष्मण यांना त्यांचे चुलते रामचंद्रपंत यांनी दत्तक घेतले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पौड येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि उच्च शिक्षण मुख्यतः पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात झाले. वर्ष 1899 मध्ये ते बीए झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर पंढरपूर, पुणे, अमरावती येथे त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. संतांची चरित्रे व साहित्याचा त्यांचा अभ्यास असल्याने तसेच त्यांच्या आवाजात माधुर्य असल्याने त्यांचे गायन, निरूपण व कीर्तन लोकांना आवडू लागले. त्यामुळे शिक्षकी पेशा सोडून वर्ष 1907 मध्ये ते धुळे येथे आले. तेथे आध्यात्माची व संतविचारांची लोकांना ओळख व्हावी म्हणून मुमुक्षू नावाचे साप्ताहिक सुरू केले. मुमुक्षूचे 1930 पासूनचे अंक नाशिकहून निघाले. ह्या साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर करून ते त्यांनी पुण्यास आणले. मुमुक्षू काढल्यानंतर लेखन-संशोधन-प्रवचन-हरिभक्तिप्रसार अशा कार्यांनाच त्यांनी वाहून घेतले. 1916 ते 1923 ह्या कालावधीत इंदूर (इंदौर) संस्थानचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांच्याकडे परमार्थाचे शिक्षक म्हणून जात असत.
पांगारकरांचे मोरोपंत आदर्श होते. त्यांच्या शैलीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी मोरोपंतांचे चरित्र आणि काव्य-विवेचन ग्रंथ लिहून मोरोपंतांच्या साहित्याचे पैलू पुढच्या पिढीसाठी उपलब्ध केले आहेत.पांगारकरांनी अप्रकाशित किंवा माहीत नसलेल्या ग्रंथाचा शोधही घेतला. त्यासाठी त्यांनी झपाटल्याप्रमाणे काम केले. रात्रंदिवस याची तमा न बाळगता त्यांचे संशोधन अभ्यास चालू असायचा. एकनाथी भागवत सोप्या रसाळ भाषेत लिहिले. आजही त्यांचे भागवत वाचन खेड्यापाड्यांतून परंपरेने वर्षानुवर्षे समारंभपूर्वक चालू आहे. ज्ञानदेवांच्या कार्याचा आढावा घेणारा “ज्ञानेश्वरांची प्रभावळ’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला. त्यांनी निरंजनमाधव ह्या कवीच्या काव्याचेही संपादन केले.
त्यांनी “मराठी वाङ्मयाचा इतिहास’ तीन खंडांमध्ये लिहिला आहे. वर्ष 1938 मध्ये “चरित्रचंद्र’ या नावाने आत्मचरित्र लिहिले. यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक जीवनशैलीचा अनुभव येतो. वाचन आणि पाठांतर भरपूर असल्याने लहान वयातच त्यांना भाषणाची, व्याख्यानाची सवय लागली. दासनवमी, मोरोपंत पुण्यतिथी, अहिल्यादेवी पुण्यतिथी असली, की पांगारकर आपल्या रसाळवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत. गणेशोत्सव, शिवाजी महाराज उत्सवासाठी त्यांना संपूर्ण महाराष्ट्र व बाहेरच्या महाराष्ट्र मंडळात बोलवले जाऊ लागले.
एकदा पुणे जिल्ह्यातील शिवापूरहून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढाणपूरजवळ पांगारकर एका घरात रात्री थांबले होते. घरमालकाकडील दप्तर त्यांनी मालकाच्या परवानगीने चाळले. तेथे त्यांना बार्शी जवळच्या सोनारी येथील संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वरांची साहित्यसंपदा सापडली. वर्ष 1901 मध्ये नाशिकला पांगारकरांचा एका पुरोहिताच्या घरी मुक्काम होता. रात्री त्यांना घरात माळ्यावर जुन्या ग्रंथांचे ढीग दिसले. रात्रभर बसून काळाच्या आड गेलेल्या पेशवेकालीन निरंजन माधव या कवीचा पाच हजार कवितांचा संग्रह त्यांना सापडला व चरित्रही मिळवले. त्यांचा संप्रदाय शोधून काढला. 10 नोव्हेंबर 1941 रोजी नाशिक येथे त्यांचे निधन झाले. अभिवादन.