पूर्वाश्रमीचे नाव अरुणा उपेंद्रनाथ गांगुली. त्यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी पंजाबमधील कालका शहरात एका श्रीमंत बंगाली कुटुंबात झाला. कालांतराने हे कुटुंब कलकत्ता शहरात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोर येथे, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथे झाले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख सदस्य वकील असफ अली यांच्याशी वर्ष 1928 मध्ये विवाह केला. त्यांनी आपल्या पतीबरोबर युरोप, अमेरिका, सोव्हिएत युनियन, मेक्सिको या देशांचा दौरा केला. युनेस्कोसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता.
असफ अली हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. साहजिकच अरुणा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्या. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यांच्याबरोबर त्या सभा, प्रभातफेऱ्यांमध्ये सहभागी झाल्या. 1930 व 1932 च्या कायदेभंग चळवळीत तसेच 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. 1930 पासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे वापरले तसेच स्वदेशी वस्तूंचा वापर केला. मिठाच्या सत्याग्रहावेळी मीठ बनविणे, मिरवणुका काढणे आणि अनेक ठिकाणी सभा घेऊन प्रचार केला.
सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा दिली. गांधी-आयर्विन करारानुसार बहुसंख्य राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली, पण अरुणा यांना मुक्त करण्यात आले नाही. अखेर जनतेच्या आंदोलनामुळे सरकारने त्यांची सुटका केली. 1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले. तुरुंगात सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुरुंगात स्वातंत्र्यचळवळीतील कैद्यांना चांगले जगता यावे म्हणून त्यांनी भूक-हरताळ करून तुरूंगाधिकाऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.
“छोडो भारत’ आंदोलनामधे त्यांनी सक्रिय भाग घेतला. अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे अधिवेशन 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईला गवालिया टॅंक मैदानावर आयोजित केले होते. गवालिया टॅंक मैदान परिसरात पोलिसांचा पहारा होता. अशा वेळी पोलिसांचा वेढा तोडून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. चळवळीला मदत करण्याच्या उद्देशाने 1946 पर्यंत चार वर्षे त्या भूमिगत कार्यरत राहिल्या. दिल्लीतील भूमिगत चळवळीच्या त्या प्रमुख नेत्या होत्या.
भूमिगत कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या गटांना भेटून त्या मार्गदर्शन व आर्थिक साहाय्यही करीत. त्या इन्किलाब या नियतकालिकाचे संपादन करीत असत. स्वातंत्र्यानंतर वर्ष 1948 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला; पण लगेचच दोन वर्षांनी समाजवादी पक्ष सोडून त्यांनी सहकाऱ्याच्या मदतीने डावा समाजवादी पक्ष निर्माण केला. कालांतराने हा पक्ष कम्युनिस्ट पार्टीत सामील झाला. 1958 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. 29 जुलै 1996 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
अरुणा यांना अनेक मानसन्मान मिळाले. सोव्हिएत लॅंड नेहरू पारितोषिक, लेनिन शांतता पुरस्कार, जवाहरलाल नेहरू पुरस्कार, पद्मविभूषण व मरणोत्तर भारतरत्न आदी सन्मान त्यांना मिळाले.