ऊठसूट चर्चा करावी, असा विषय तरी आहे का हा? माध्यमंसुद्धा उगीचच “भडका’ वगैरे शब्द वापरतात. कसला भडका? तरी बरं, राजकीय नेत्यांकडून रोज कुठला ना कुठला “तडका’ पत्रकार मंडळींना मिळतोय.
अहो, माणूस शेकडो किलोमीटर लांब जातो. तिथं झाडी, डोंगर आणि हॉटेल पाहतो. त्याचं प्रामाणिकपणे (अनेकांच्या शब्दांत “ऑरगॅनिक’ वगैरे) वर्णन करतो आणि मुंबईत आल्याबरोबर आमदार निवासातल्या नेमक्या त्यांच्याच खोलीच्या छपराचा गिलावा कोसळतो, हा प्राधान्याचा विषय नाहीये का? हा योगायोगच आहे की कुणाचं कारस्थान आहे, याचा शोध घ्यायला नकोय का? तिकडे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळात कोण-कोण असायला हवं, याचा बारकाईनं हिशोब केला जातोय.
आषाढी एकादशी दोन दिवसांवर आलीये. मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार. आपल्या सगळ्यांच्या सुखा-समाधानासाठी विठ्ठलाजवळ प्रार्थना करणार. तत्पूर्वी किमान आठ-दहा लोकांचं तरी मंत्रिमंडळ तयार व्हावं म्हणून नेटानं प्रयत्न चाललेत; वाटाघाटी चालल्यात आणि काही माणसं अवघ्या 50 रुपयांसाठी रडत बसलीत. बरं दिसतं का हे? जगात कुठे युद्ध चाललंय, कुठे तणाव आहेत, पुरवठा साखळी विस्कळीत झालीये, अमेरिकेसारख्या सर्वाधिक सुरक्षित देशात लोकांना असुरक्षित वाटायला लागलंय, लहान-लहान मुलं तिथे बंदुका घेऊन फिरतायत आणि हो… मुख्य म्हणजे, तिथंही महागाईनं उच्चांक गाठलाय! महासत्ता म्हणून महागाईनं सोडलेलं नाहीये अमेरिकेला..! पण तिकडे कुणी बघेनाच झालंय!
काही-काही लोक ना, रडण्यासाठीच जन्माला आलेले असतात. कुठल्याही फालतू कारणासाठी गळा काढतात! किचनच्या ओट्याखाली लपून राहणाऱ्या साडेतीन फुटांच्या यःकश्चित वस्तूसाठी किती ऊर बडवून घ्यायचा..! अवघ्या 14 किलो 200 ग्रॅम वजनाची वस्तू फक्त 50 रुपयांनी महागली म्हणून किती आकांडतांडव करायचा? आठ-नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनांकडे बोटं दाखवून-दाखवून बोटं मोडत बसायला वेळ आहे का कुणाला आजकाल? अहो, स्वातंत्र्याचं आंदोलनसुद्धा आठवायची मारामार, तिथं महागाईविरोधातली आंदोलनं कोण उकरून काढणार? समजा काढलीत उकरून आणि “”त्यावेळी कुठे होता,” असं तुम्हाला कुणी विचारलं तर आहे का उत्तर?
असेल गेल्या वर्षी जूनमध्ये 809 रुपये दर… अवघ्या 13 महिन्यांत झाला असेल 1053 रुपये! 13 महिन्यांत 244 रुपयांनी दुसरं काहीच महागलं नाही का? 8 वर्षांत 125 टक्क्यांनी दुसरं काहीच महागलं नाहीये का? आठवून बघा! दर तीन-चार वर्षांनी मोबाइल बदलता, हॉटेलमध्ये जाऊन खुशाल हादडता, पावसाळा सुरू झाला म्हणून निसर्गात वगैरे फिरायला जाता… पैशांची अशी उधळपट्टी करताना कुठे जाते तुमची महागाईविरुद्धची चीड? किचनचं बजेट कोलमडलं म्हणून बोंबा ठोकायला सगळेच मोकळे असतात; पण देशाचं बजेट मांडताना, चालवताना दाखवलेलं कौशल्य दिसतसुद्धा नाही?
कुणीही “भडका’ वगैरे शब्द वापरायचं कारण नाही. वस्तू ज्वालाग्राही आहे म्हणून असे शब्द सुचतात. बाहेर परिस्थिती किती ज्वालाग्राही आहे हे मात्र दिसून न दिसल्यासारखं करतात लोक! चांगलं चाललेलं असेल तर बिब्बा घालणारे आतून आणि बाहेरून हल्ले करायला टपलेलेच असतात. खुट् वाजलं की कान टवकारतात. त्यांच्यापुढे भलते विषय मोठे करायचे नसतात. फार दूर नको, श्रीलंकेतली महागाई बघून या एकदा आणि स्वतःला भाग्यवान समजा..!