घंटा वाजली, शाळा सुटली. सर्व मुले धावपळीने आपापल्या घरी निघाली. संजू देखील पटकन शाळेतून बाहेर पडला. त्याला असं झालं होत की, मी कधी एकदा घरी पोहोचतो आणि आईला आपली पाटी दाखवतो. कारण आज बाईंनी वर्गात मुलांना काही गणितं दिली होती. संजूची सर्वच्या सर्व गणितं बरोबर आली होती.
बाईंनी त्याच्या पाटीवर “छान’ असा शेराही दिला होता. तो त्याला त्याच्या आईला दाखवायचा होता. तो शेरा पुसला जाऊ नये, म्हणून त्याने पाटी दप्तरात न ठेवता आपल्या हातात ठेवली होती. तो घाईघाईने घरी निघाला होता. पण अचानक त्याला ठेच लागली आणि खाली पडला. त्याबरोबर त्याच्या हातातली पाटीही खाली पडली आणि फुटली. त्याला फार वाईट वाटले.
आता आपण आईला काय दाखविणार? त्याला रडू आले. त्याला लागलं, त्याचे कपडेही मळाले, पण त्या कशाचच नाही परंतु पाटी फुटली याचं संजूला खूप वाईट वाटत होतं. शेजारी राहणाऱ्या राधाकाकूंनी संजूला रस्त्यात रडताना पाहिले. त्या त्याच्या जवळ आल्या. त्यांनी संजूच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवत विचारले, “”काय झाले संजू?”
स्वत:ला सावरत आणि डोळ्यातले पाणी पुसत तो म्हणाला, “”काकू मी रस्त्यात ठेच लागून पडलो. माझी पाटी फुटली आहे. आता आई मला रागवेल. तिने परवाच मला नवी पाटी आणून दिली होती.”
राधाकाकू म्हणाल्या, “”अरे एवढेच ना मग त्यात काय आईला सांग की, मी नीट पाटी सांभाळून घरी आणत असताना एका दाणगट मुलाने येऊन मला धक्का दिला, मी खाली पडलो आणि माझी पाटी फुटली.”
राधाकाकूंचा तो सल्ला ऐकून संजू म्हणाला, “”म्हणजे काकू मी माझ्या आईशी खोट बोलू?” त्यावर त्या म्हणाल्या, “”अरे पण तू जर खरं सांगितलंस तर आई तुला रागावेल, बोलेल, कदाचित मारसुद्धा देईल. मग काय करशील?”
त्यावर काहीशा निश्चयाने संजू म्हणाला, “”नाही काकू, मी माझ्या आईशी खोट बोलणार नाही. आई रागाऊ दे नाही, तर मारू दे.” आपलं मत ठामपणे आणि स्पष्टपणे मांडून संजूने डोळे पुसले आणि तो घरी परतला. घरी येताच त्याने आईला झालेला प्रकार सांगितला. आई म्हणाली, “”संजू जाऊ दे पाटीच फुटलीना, फुटू दे. पण तुला तर कुठे जास्त लागले नाहीना? संजू हे बघ एक गोष्ट नीट लक्षात ठेव, नेहमी पायाखाली नीट बघून चालावं.”
“”अगं आई पण ती बरोबर आलेली गणितं, तो बाईंनी दिलेला शेरा, ते सगळं मला तुला दाखवायचं होतं ना.” “”अरे संजू तू सांगितलंस ना मला मग झालं तर, त्याला पुराव्याची काय गरज आहे?” आई म्हणाली.
त्या दोघांचं हे बोलणं चालू असतानाच राधाकाकू आल्या आणि संजूच्या आईला म्हणाल्या, “”खरंच तुमचा संजू मोठा सच्चा आहे बरं का? मी त्याची परीक्षा घेत होते. पण त्याने मात्र हेच सांगितले की, मी काही खोटं बोलणार नाही. तुम्ही त्याला छान वळण लावलं आहे. त्याच्यावर चांगले संस्कार केले आहेत.” राधाकाकू असं बोलून निघून गेल्या आणि आईने संजूला प्रेमाने आपल्या जवळ घेतले.