गुजरातची निवडणूक रंगात आली असतानाच आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली आणि राजकारणी मंडळींसह राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. उभय नेत्यांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली? हे त्यांनाच ठाऊक. परंतु, या बैठकीत जे काही शिजलं ते मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळेल, एवढं नक्की!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाची तमाम नेत्यांची फौज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतली असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पाटणा येथे जाऊन भेट घेतली. यानंतर तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढली असतानाच तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा घडून आली. यामुळे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आले नसते तरच नवल!
शिवसेना या पक्षाला वर्षानुवर्षांपासून “ऑक्सिजन’ पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट खूप महत्त्वाची आहे. सध्या, दोन्ही नेत्यांच्या या भेटीमागे मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आणि मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. परंतु, सत्ताधारी पक्षाकडून ज्या पद्धतीचं राजकारण देशात केलं जात आहे त्यामुळे आदित्य-तेजस्वीची भेट तरुणांची आघाडी म्हणून उदयास येऊ शकते.
जेडीयू आणि रालोदचे नेते उघडपणे या भेटीच्या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नाहीत. परंतु, आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची घेतलेल्या भेटीमागे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे कनेक्शन असल्याचे खासगीत मान्य करतात. मुंबईच्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांची भूमिका खूप महत्त्वाची असते. ही भेट झाली तेव्हा सेना नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी म्हटली जात आहे. शिंदे यांनी शिवसेना फोडली त्यामुळे मूळ सेनेची ताकद विभागली गेली, असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा प्रभाव मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतही दिसून येईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना उघडपणे ही बाब मान्य करायला तयार नाही. तरीसुद्धा, शिंदे गट मुंबईच्या निवडणुकीत सेनेच्या ताकदीला प्रभावित करू शकते, ही बाब ठाकरे यांना ठाउक आहे. गुजरातची निवडणूक आटोपताच भाजपच्या नेत्यांकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकीची मोहीम हाती घेतली जाईल. दरम्यान, भाजपच्या हालचाली सुरू होण्यापूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेने हालचाली करायला सुरुवात केली आहे. भाजपने मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते कृपाशंकर सिंग यांच्यासह अनेक नेत्यांना आधीच गळाला लावले आहे. आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना हाताशी धरून मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यात छत्तीसचा आकडा! बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी तर यादव समाजवादी विचारधारेचे. मराठी आणि उत्तर भारतीय हा विषय दोन्ही नेत्यांमधील जणू तलवारीची धार. मात्र, आता काळ बदलला आहे. राजकारण बदलले आहे. लोकांच्या अपेक्षा आणि गरज बदलल्या आहेत. अशात, बाळासाहेबांचे नातू आदित्य यांनी लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांची घेतलेली भेट भविष्याची नांदी ठरू शकते. जेडीयूनुसार उभय नेत्यांची ही भेट एक शिष्टाचार होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आजोबांच्या पक्षाची जू आदित्य ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतले असल्याचे दिसून आले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आदित्य यांनी अनेक सभा घेतल्या आणि त्यास सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतोय. आता ते केवळ लोकांत जाऊन पक्षाला समोर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच राजकीय डावपेचसुद्धा आखत आहेत. कुणाला सोबत घेतलं तर पक्षाला बळकटी मिळेल याचा अंदाज बांधून आदित्य यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली, असं दिल्लीच्या वर्तुळात बोलले जात आहे.
दुसरीकडे, तेजस्वी यादव हे बिहारमधील सर्वाधिक यशस्वी आणि प्रभावी युवा नेते आहेत. बिहारच्या निवडणुकीत त्यांनी आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध करून दाखविलं आहे. अशात दोन्ही नेत्यांची हातमिळवणी भविष्यात वेगळ्या राजकारणाची दिशा ठरवू शकते. हे खरं आहे की, मुंबईतील उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन करणे शिवसेनेचा इतिहास राहिला आहे. परंतु, बहुतांश आंदोलने हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झाली आहेत. अर्थात राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा ही आंदोलने झाली होती. आता राज ठाकरे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला आहे. अशात, तेजस्वी यादव यांनी मुंबईत येऊन शिवसेनेची बाजू घेतली तरी त्यांना विरोधाचा सामना करावा लागणार नाही.
याशिवाय, दोन्ही घराण्यातील तरुण नेत्यांच्या या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट म्हणूनही बघितलं जात आहे. आदित्य ठाकरे याआधी राहुल गांधींच्या “भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले. एवढंच नव्हे तर, तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोपही केला होता. उत्तर भारतातील लोकांसाठी मुंबई हा एक मोठा आधार आहे. मुंबईत काम करणारे मजूर आहेत, रिक्षाचालक आहेत, टॅक्सीचालक आहेत. रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक आहेत. यात बिहारमधील लोकांची संख्या खूप आहे. आदित्य ठाकरे या मतदारांना आकर्षित करू पाहतात. त्यामुळेच ते राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
तेजस्वी यादव यांनी मुंबईत प्रचार केला तर त्याचा फायदा ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मिळू शकतो. 2011 च्या जणगणनेनुसार, मुंबईच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के लोक उत्तर प्रदेशातील आहेत. आता तर ही संख्या बरीच वाढली आहे. उभय नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीचा फायदा केवळ आदित्य ठाकरे यांनाच मिळेल असेही नाही. तेजस्वी यादव यांनाही याचा फायदा होईल, असं जाणकार मानतात. बिहार आणि उत्तरप्रदेशातील जनता मुंबई, दिल्ली किंवा सुरत या शहरांकडे धाव घेत आहेत. बिहारवासीयांचे हे स्थलांतर भविष्यातही सुरूच राहणार आहे. यामुळे बिहारचे नागरिक सध्या मुंबईचे मतदार बनले आहेत. या नव्या मतदारांवर अन्य पक्षांचाही डोळा आहे. यामुळे इतर पक्षही त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात. शिवसेनेने उत्तर भारतीयांच्या हितासाठी चांगले आश्वासन दिले तरी याचे श्रेय थेट तेजस्वी यादव यांना जाईल.
या भेटीने भाजप नेत्यांना कामाला लावले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा “जीव’ मुंबई महानगर पालिकारूपी पोपटात अडकला आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत या पोपटाचा गळा मुरडायचा आहे. शिवसेनेला गुडघ्यावर आणायचं असेल तर आधी या पोपटाचा बंदोबस्त करावा लागेल, हे भाजपला चांगले ठाऊक आहे. कदाचित म्हणूनच, 2017 मधील मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यात भाजपला चांगले यश सुद्धा मिळाले. परंतु, महापौर शिवसेनेचाच झाला. भाजपला आता पुढच्या निवडणुकीत संधी साधायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा भाजपसोबत आहेत. आता, आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची ही भेट भाजपच्या स्वप्नांवर विरजण सोडते की भाजप संधीचं सोने करते? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल!