“अर्बन नक्सल’च्या जोडीला “अर्बन टायगर’ असं एक बिरुद आता तयार करायला हवं. “अर्बन नक्सल’ खरोखर अस्तित्वात आहेत की नाहीत, हे तपास यंत्रणांनाच ठाऊक; पण “अर्बन टायगर’ मात्र मोठ्या संख्येनं अस्तित्वात आहेत आणि आपण जी फोडू ती डरकाळीच आहे, असा त्यांचा प्रामाणिक दावा आहे.
विषय कोणताही असो, आपल्याला त्यातील ज्ञान असो वा नसो (किंबहुना नसलेलंच बरं), वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचे आणि टीआरपी कमवायचा, ही या शहरी वाघांची खासीयत! “वाघ’ शब्द उच्चारताच किमान महानगरातल्या लोकांना पूर्वी ठराविक चेहरेच डोळ्यांपुढे येत असत; परंतु आता चेहरे लक्षातही ठेवता येणार नाहीत, इतके “वाघ’ वाढलेत. जंगलातल्या वाघांची संख्या कमी होत असताना “अर्बन टायगर’ मात्र ती उणीव यथेच्छ भरून काढतायत. विशेषतः इतिहास हा या मंडळींचा लाडका विषय..!
या विषयाचा किमान अभ्यास असेल तरच तोंड उघडावं, असा संकेत काही वर्षांपूर्वी होता. परंतु आता सगळ्याच संकेतांची मोडतोड करणं ठरलेलंच असताना हा संकेत तरी कसा पाळायचा? उलट, उद्या बोलण्याचा नंबर कुणाचा, हे आजच ठरवलेलं बरं असं या वाघांचं म्हणणं असावं. या वाघांना कधीही जंगलात जावं लागत नाही. सहा-आठ पदरी गुळगुळीत रस्त्यांवरून यांच्या मोटारींचा ताफा सुसाट धावत असतो. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहून डरकाळी फोडण्यातही मजा असते..!
कुठल्यातरी निमित्तानं डरकाळी वगैरे फोडण्यासाठी ते एखाद्या किल्ल्यावर जातात, तेवढंच काय ते या मंडळींचं वनपर्यटन. परंतु प्रतापगडासारख्या किल्ल्याच्या सभोवताली साडेतीनशे वर्षांपूर्वी केवढं जंगल असेल? त्यात किती हिंस्र श्वापदं फिरत असतील? दाट झाडीतून वाट काढत घोड्यांवरून मावळे किल्ल्यावर कसे पोहोचत असतील? एवढे प्रश्न जरी या मंडळींना पडले असते ना, तरी “वाघ’ कुणाला म्हणायचं हे त्यांना समजलं असतं. अशा आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत झुंजून ज्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला, त्यांचा वापर स्वतःच्या बेगडी स्वाभिमानासाठी करताना या मंडळींना निश्चित काहीतरी वाटलं असतं.
राजकारण्यांपासून फिल्लमवाल्यांपर्यंत सगळ्यांनी इतिहासाशी खेळ करून स्वाभिमानाची मातीच करायचं ठरवलं असेल तर मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा उमटलेली ही मातीच त्यांचं भवितव्य ठरवेल. रोज उठून छाती काढून वाघाच्या ऐटीत बाहेर पडणाऱ्या या मंडळींना आजही त्या काळाची अनुभूती घेण्याची संधी आहे. खरा ढाण्या वाघ काय असतो आणि त्याच्या भीतीच्या छायेत गावंच्या गावं रात्र जागून कशी काढतात, हे बघायला या मंडळींनी गडचिरोली किंवा भंडारा जिल्ह्यात जावं. वनखात्याच्या किंवा कोणत्याही सरकारी रेस्ट हाउसमध्ये न राहता दुर्गम खेड्यातल्या लहानशा घरात फक्त एक रात्र मुक्काम करावा.
चार वर्षांत तीनेकशे बळी घेणारा वाघोबा जेव्हा रात्रीच्या वेळी घराजवळ येऊन गुरगुरतो, तेव्हा बायाबापड्या लेकरांना छातीशी कसं कवटाळून घेतात, हे दाखवायला “अर्बन टायगर्स’ची एखादी “सहल’ याही भागात न्यायला हरकत नाही. इतिहासाचं ज्ञान घ्यायचंच नाही, असं ठरवलं असलं तरी वाघाचं ज्ञान घ्यायला काय हरकत आहे? स्वाभिमान कमावताना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याचं तरी भान डरकाळ्या फोडत फिरणाऱ्यांना येईल आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर होतील.