अमेरिका-पाकिस्तान लष्करी करारामुळे आशियातील स्वातंत्र्य चळवळीचा घात
नवी दिल्ली, ता. 4 – काश्मीर प्रश्नावरील भारताचे पंतप्रधान प. जवाहरलाल नेहरू यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान मोहंमद अली यांच्याबरोबर झालेला पत्रव्यवहार आज प्रसिद्धीस देण्यात आला. पाकिस्तान-अमेरिका लष्करी करारामुळे काश्मीरवर पाकिस्तानचे आक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे पं. नेहरूंनी अलींना ता. 29 सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तेही पत्र प्रसिद्धीला देण्यात आले आहे. भारताने काश्मिरात किती सैन्य ठेवावे, ह्या प्रश्नाचा पाकिस्तान-अमेरिकी लष्करी कराराच्या संदर्भातच विचार केला पाहिजे, असे प. नेहरू आपल्या पत्रात म्हणतात. पाकिस्तान-अमेरिका लष्करी करारामुळे पाकिस्तानचे लष्करी बळ वाढणार आहे. म्हणून काश्मिरात पुरेसे भारतीय सैन्य ठेवणे अपरिहार्य झाले आहे, असे पं. नेहरू पुढे म्हणतात.
प. जर्मनीत राजकीय वादळ
बॉन, ता. 4 – प. जर्मनीस सार्वभौमत्व बहाल करून नाटोप्रणीत 12 सैनिकी विभाग उभारण्याची लंडन परिषदेने मुभा दिल्याचे जाहीर झाल्यानंतर येथे मोठे राजकीय वादळ निर्माण झाल्याचे दिसते. प. जर्मनीचे चॅन्सेलर अडेनॉर येथे येताच त्यांना या वादळाला तोंड द्यावे लागले.
मंत्रिमंडळातील प्रागतिक उजव्या स्वतंत्र लोकशाही पक्षाचे सदस्यच, रशियाशी गोलमेज परिषद घेऊन बोलणी करा म्हणून ओरडू लागले असून शीतयुद्ध बंद करण्याची मागणी करीत आहेत. विरोधी पक्षाचे सोशल डेमोक्रेटस लंडन करारावर हल्ला करण्याची तयारी करीत असून मृतवत झालेल्या युरोपीयन लष्करास आमचा सक्त विरोध होता असे म्हणत आहेत.
वधूंचा तुटवडा
इंदुर, ता. 4 – मध्यभारतात वधूंचा तुटवडा पडल्याचे दृष्टोत्पत्तीस आले आहे. लग्न होणाऱ्या 88 टक्के मुलांना बाहेरून वधू मिळवावी लागते. मध्यभारत राज्याची पुरुषसंख्या 41,33,075 असून स्त्रियांची संख्या 31,21,079 आहे.