-हिमांशू
तूच दिल्लीची निर्भया.., तूच हैदराबादची निर्भया… आणि यूपीमधली निर्भयाही तूच! पुन्हा एकदा निर्भयाच! 2012 मध्ये हे नाव तुला मिळालं. तेव्हापासून आजअखेर तुझं भय जरासुद्धा कमी झालं नाही आणि तरीसुद्धा “निर्भया’ हे नाव मात्र आम्ही कायम ठेवलं.
खरं सांगू? आता हे नाव उच्चारतानाही ओशाळलेपण जाणवतं. वखवखलेली जनावरं आपल्याच समाजात फिरतायत, इच्छा होईल तेव्हा तुझे लचके तोडतायत, तू बोलू नये म्हणून तुझी जीभ हासडतायत, तू हालचाल करू नये म्हणून हातपाय आणि पाठीचा कणा मोडतायत आणि तुला कुठेतरी फेकून देऊन पसार होतायत. हे वखवखलेपण समाजात कुणी, कधी आणि कसं पेरलं यावर विचार करायला आम्ही तयार नाही; पण दरवेळी तुला “निर्भया’ म्हणायला तयार आहोत!
तुझ्या लढाईत आम्ही ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सहभागी आहोत. आधी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर तरी यावं लागत होतं. आता त्याचीही गरज उरलेली नाही. सोशल मीडियावर “अरेरे’ म्हटलं की आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खतम! मग पुन्हा राजकारण सुरू. घटना कुठल्या राज्यात घडली? तिथं कुणाचं राज्य? पीडितेची जात कुठली? आरोपींची कुठली? असे धागेदोरे काढायचे, एकमेकांकडे बोटं दाखवायची, अत्यंत खालच्या स्तरावरची भाषा वापरून “सोशल भांडण’ उकरायचं आणि उरकायचं… मग पुन्हा नव्या निर्भयाची वाट बघत बसायला आम्ही मोकळे!
“निर्भया’ हे तुझं नाव सार्थ ठरावं यासाठी काहीच होत नाही, असं मात्र नाही. दिल्लीतल्या निर्भयाच्या मृत्यूनंतर कठोर कायदा झाला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवण्याचा निर्णय झाला. मुख्य म्हणजे, जनआंदोलन झालं. रस्त्यावरची ती गर्दी त्यावेळी खूपच आश्वासक वाटली होती. पण त्यानंतर सोशल मीडियाचा डिमडिम खूपच वाढत गेला. आम्ही ऑनलाइन एकमेकांची गचुंडी धरायला शिकलो. बरेचजण खोट्या नावानं ऑनलाइन येऊन शिवीगाळ करण्यात तरबेज झाले. त्याचाही फटका पुन्हा तुलाच बसला, निर्भया!
मुलींना उद्देशून विचित्र भाषा वापरली जात होतीच; पण हळूहळू अशा मंडळींचं धारिष्ट्य वाढून ऑनलाइन बलात्काराची धमकी देईपर्यंत मजल गेली. तू ज्या समाजात राहतेस, तो हळूहळू इतका आक्रमक होत गेला की, कायद्याच्याही पुढे जाऊन “एन्काउंटर’द्वारे तुला न्याय देण्याची भाषा करू लागला. रस्त्यावर चुकते केलेले हिशोब लोकांना आवडू लागले. “कुणाचीही गाडी कधीही पलटू शकते,’ वगैरे वाक्यं चक्क नेतेमंडळींच्या तोंडून येऊ लागली. सेलिब्रिटींनीसुद्धा तीच “री’ ओढायचं ठरवलं. हळूहळू असा ताबडतोब रस्त्यावर केला जाणारा न्यायसुद्धा सवयीचा होऊन जाईल. परंतु प्रश्न असा की, एवढं करूनसुद्धा तुझं “निर्भया’ हे नाव सार्थ ठरेल का?
खरं तर तू एक भीती ओलांडूनच जन्माला येतेस. गर्भातच अंत होण्याची भीती! जन्माला आल्यावर मग भीतीची साखळीच सुरू होते. असंख्य प्रकारची भीती. बोलायची, चालायची, वागायची, हसायची… सगळ्याची भीती. महानगर असो किंवा खेडं असो, भीती टळत नाही. फक्त तिचा प्रकार बदलतो. भीतीच्या छायेतच वय वाढत असतं आणि वय वाढण्याचीही भीती वाटत असते. भीती दाखवणारे कधी प्रेमाची तर कधी चिंतेची शपथ घालतात… आणि वाट पाहतात तू “निर्भया’ होण्याची!