लोकसभा विरुद्ध न्यायमंडळे असा झगडा होणे घातक
नवी दिल्ली, दि. 28 – लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयकावरील तीन दिवस चाललेली सर्वसाधारण चर्चा केंद्रीय कायदामंत्री गोखले यांच्या समारोपाच्या भाषणानंतर संपली. विधेयकाबाबत तद्नंतर झालेल्या मतदानात 349 उपस्थित सदस्यांपैकी 346 जणांनी अनुकूल मत दिले. आता गृहात कलमवार चर्चेला प्रारंभ झाला आहे.
लोकसभेबरोबर न्यायमंडळाचा पुनः झगडा होण्याचा प्रसंग आला तर तो न्यायालयाच्या दृष्टीने एक काळा दिवस ठरेल. न्यायालयाला तिसरे गृह बनण्याला लोकसभा कधीच मान्यता देणार नाही, असा इशारा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना तयार होताना दिला होता.
एकपक्षीय राज्यपद्धती नको
नवी दिल्ली – भारतात एकपक्षीय राज्यपद्धती असू नये असे आपले मत असल्याचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. कोणत्याही वेळी बहुमत मिळविणे शक्य आहे; परंतु हा उद्देश असू नये. आपण केवळ बहुमत मिळवून सरकार स्थापण्याचा उद्देश ठेवू नये. देशासाठी सामाजिक पायावर आधारलेले असे काही करण्याबाबत आपण विचार केला पाहिजे.
आणीबाणीच्या आधी चलनफुगवट्यास आळा घालण्यासाठी मी सक्तीच्या बचतीसारखे काही उपाय योजिले तेव्हा काही लोक मला म्हणाले की, यामुळे आपण निवडणुकांत हरण्याची शक्यता आहे. पण मी सांगितले की, आपण निवडणुका हरलो तरी चालेल पण योग्य मार्गानेच गेले पाहिजे, असे पंतप्रधान गांधी म्हणाल्या.