-उत्तम पिंगळे
(इंद्रदेवाच्या दरबारात वरुणदेवाला तातडीने बोलावले आहे. वरुणदेव येतात.)
वरुणदेवः प्रणाम देवराज, एकदम तातडीने बोलावले आहे?
इंद्रदेव : होय बरोबर आहे, आपण स्थानापन्न व्हा. (वरुणदेव बसतात)
इंद्रदेव : नारदमुनींनी निरोप आणला होता की भूतलावरील भारतखंडात आपण खूपच कहर केला आहे म्हणे?
वरुणदेव : नाही देवराज, अलीकडे माझे आगमन कधी व किती होणार हे तेथील मानव शात्रीयदृष्ट्या सांगू लागला आहे आणि बहुतेक त्याप्रमाणेच माझे तेथे आगमन होत असते.
इंद्रदेव : पण, त्या भारतदेशी देवादिकांना खूप मान दिला जातो. तेथील ईशान्येकडून उत्तरेत मग गुजरात प्रांत पार करून आपण महाराष्ट्र प्रांतामध्ये सध्या कहर केला आहे.
वरुणदेव : होय, मलाही ते जाणवत आहे. पाऊस जास्त पडत आहे, असे मला वाटत नाही.
इंद्रदेव : पण नारदमुनी तेथील मुंबापुरीत गेले होते, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर व परशुराम भूमी कोकणासह आपण प्रलयसदृश्य परिस्थिती केली आहे म्हणे?
वरुणदेव : आपण म्हणत आहात त्यात तथ्य आहे, पण मी जास्त पर्जन्यमान करीत आहे म्हणून नाही देवेंद्र.
इंद्रदेव : मग नक्की काय अर्थ काढायचा आम्ही? कारण नारदमुनी सांगत होते की, लोक हवालदिल झालेले आहेत.
वरुणदेव : आपला रोख मी जाणत आहे. पण आपण जो सुभा सांगत आहात तो मुंबापुरी व आजूबाजूचा परिसर तसेच परशुरामाची कोकण भूमी या भागात, मानव जे मोजतो त्या एककात सांगायचे तर मुंबापुरी ते थेट गोमांतकापर्यंत साधारण दीडशे इंच किंवा चार हजार मिलीमीटर एवढा मी दरवर्षी पडत असतो. पण आता अलीकडे मानवजातीने केलेल्या कार्यामुळे हरित वायू इफेक्ट, जंगलतोड, सुधारणांच्या नावे पर्वत तोडणे, वायूमध्ये अनेक घातक वायू उत्सर्जित करणे यामुळे माझे चक्र पार बदलून गेले आहे. त्यामुळे मी सलग चार महिने व्यवस्थित न पडता कधी अजिबात पडत नाही.
इंद्रदेव : मग आताच सर्वांना तू नको का आहेस?
वरुणदेव : त्याला कारण मानवच आहे. मुंबापुरी व आजूबाजूच्या परिसरात समस्त देशभरातून लोक येतात राहण्यासाठी, आता जागाच शिल्लक नाही. मग तेथील लोक अतिक्रमण करून घरे, बंगले व राहण्यासाठी मोठमोठे मनोरे उभारत आहेत. सर्वत्र कॉंक्रिट नावाचा पदार्थ टाकून जमिनीला झाकून टाकत आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यास जमिनीत जिरण्यास वाव राहात नाही. समुद्रातही भराव टाकत आहेत. नदी-नाल्यांमध्येही भराव टाकून जमीन राहण्यासाठी तयार करत आहेत. पूर्वी नद्या, नाले, ओहळ खूप मोठमोठे होते तसेच खूपच मोकळी जमीन असल्यामुळे जमिनीतही माझे पाणी जिरले जाऊ शकत असे. आता ते शक्य नाही म्हणून मी काही काळ जरी जोरात पडलो की रहदारीचे रस्ते, आगगाडीचे रूळ पाण्याखाली जाऊ लागतात. मनोऱ्यांच्या तळमजल्यापर्यंतही पाणी जाऊ लागते. मग त्यांचे प्रचंड नुकसान होते. मलाही याचे खूप दु:ख होते पण काय करणार?
इंद्रदेव : ठीक आहे, मानव तर सुधारायलाच पाहिजे पण आता देत असलेली शिक्षा थोडी जास्तच होत आहे. तर आपण थोडे आवरते घ्यावे. यातून तेथील मानव काय धडा घेतो ते आपण पाहू.
वरुणराज : होय, जमवण्याचा प्रयत्न करतो. (असे म्हणून निघतात.)