कोळगाव – येथील रयत शिक्षण संस्थेच्या कोळाईदेवी विद्यालयाने गुरुकुल विभागामार्फत घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात पालकांनी व शिक्षकांनी खाल्लेल्या केळीच्या साली खाऊन टाकलेल्या व फरसाणच्या प्लेटी विद्यार्थ्यांनाच उचलायला लावल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना भेटणार असल्याचे एका पालकाने सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कोळाईदेवी विद्यालयात शनिवारी (दि.3) गुरुकुल विभागामार्फत पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये पाल्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत चर्चा न करता शाळेच्या इमारतीबाबत तसेच भौतिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मेळाव्यासाठी आलेल्या पालकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने केळी, फरसाण व चहाचे वाटप करण्यात आले होते.
पालकांनी खाल्लेल्या केळीची साले तसेच चहाचे कप व फरसाण यांच्या प्लेटी विद्यालयातील शिपाई तेथे उपस्थित असताना देखील मुलांना उचलण्यास भाग पाडले. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दि.31 जुलै रोजी कोळगाव येथे सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या कोळगाव येथील राजकीय सभेच्या स्वागतासाठी विद्यालयाने विद्यालयातील मुलींचे लेझिम पथक दिले होते. याबाबत ही रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना पालकांचे शिष्टमंडळ भेटून यासंबंधित जबाबदार असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.