-डॉ. हनुमंत यादव
सुबत्तेच्या जागतिक क्रमवारीत 2019 मध्ये भारताचे स्थान शेवटच्या वीस देशांमध्ये आहे. भारतातील दरडोई उत्पन्न आणि मानवी विकास निर्देशांकात दरवर्षी सुधारणा होत आहे. परंतु तरीही सुबत्तेच्या बाबतीत घसरण होताना दिसते.
संयुक्त राष्ट्रांच्या सातत्यपूर्ण विकास कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या 2019 च्या सुबत्ताविषयक जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान घसरले आहे. 156 देशांच्या या यादीत भारताची 2012 पासून सातत्याने घसरण होत असून, या बाबतीत सर्वांत तळात असलेल्या वीस देशांच्या पंक्तीत भारताला यंदा स्थान मिळाले आहे. सुबत्ताविषयक पहिली जागतिक क्रमवारी संयुक्त राष्ट्रांनी 2013 मध्ये जारी केली होती. 156 देशांची क्रमवारी सुबत्ता निर्देशांकाच्या आधारे तयार करण्यात आली होती. 2013 मध्ये या यादीत भारताचा क्रमांक 111 वा होता. 2015 मध्ये भारताला 117 वा क्रमांक मिळाला, 2016 मध्ये 118 वा, 2017 मध्ये 122 वा क्रमांक मिळाला, तर 2018 मध्ये 11 पायऱ्यांची घसरण होऊन भारत थेट 133 व्या स्थानावर फेकला गेला. 2019 मध्ये आणखी घसरण होऊन भारताला 140 वे स्थान मिळाले आहे. एखाद्या देशातील नागरिक स्वतःला किती सुखी मानतात, या आधारावर ही क्रमवारी तयार केली जाते. उत्पन्न, आरोग्यपूर्ण जीवन, सामाजिक सलोखा, आयुष्यातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, विश्वास तसेच भ्रष्टाचाराविषयीचे मत अशा सहा निकषांच्या आधारावर सुबत्ता निर्देशांक तयार केला जातो आणि मग त्यांची क्रमवारी लावली जाते.
जगातील देशांचा सुबत्ताविषयक वार्षिक निर्देशांक तयार करताना गॅलॉप जागतिक मतचाचणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून आकडेवारी संकलित केली जाते. या मतचाचणी सर्वेक्षणात विविध देशांतील लोकांना 14 विविध क्षेत्रांमधील स्थितीच्या आधारावर ते स्वतःला किती सुखी मानतात, हे विचारले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या सातत्यपूर्ण विकास कार्यक्रमांतर्गत गॅलॉप जागतिक सर्वेक्षणाकडून एकत्रित करण्यात आलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून विविध देशांना शून्य ते दहा गुण दिले जातात आणि त्यानुसार हा अहवाल तयार करण्यात येतो. जागतिक सुबत्ताविषयक निर्देशांक 2019 अनुसार, फिनलॅंडला सर्वाधिक 7.77 गुण प्राप्त झाले आणि पहिला क्रमांक लागला. 2018 च्या क्रमवारीतसुद्धा फिनलॅंड 7.63 गुणांसह पहिल्या स्थानावर होता. 7.60 गुण मिळवून डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर, तर 7.55 गुण मिळवून नॉर्वे तिसऱ्या स्थानावर आहे.
156 देशांमधील गुणानुक्रमे चौथ्या ते दहाव्या स्थानावरील देश पुढीलप्रमाणे ः आइसलॅंड, नेदरलॅंड, स्वित्झर्लंड, स्वीडन, न्यूझीलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रिया. हे सर्व देश 2013 पासून पहिल्या दहा देशांच्या यादीत आपले नाव टिकवून आहेत. अर्थात, त्यांच्या क्रमवारीत किरकोळ चढउतार झाल्याचे दिसते. 156 देशांच्या यादीत सर्वांत शेवटचा क्रमांक आहे सुदानचा. या देशाला अवघे 2.85 गुण मिळाले आहेत. 2019 च्या यादीत शेवटच्या दहा देशांमध्ये दक्षिण सुदान, मध्य आफ्रिकी संघराज्य, अफगाणिस्तान, टांझानिया, रवांडा, येमेन, मलावी, सीरिया, बोटसवाना आणि हैती या देशांचा समावेश आहे. यातील बहुतांश देशांमध्ये यादवी युद्ध सुरू असल्यामुळे लोक असुरक्षित, अभावग्रस्त आणि भयग्रस्त आहेत. दरडोई उत्पन्न आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत या देशांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळेच हे देश जगातील सर्वांत तळाच्या क्रमांकावर आहेत. अहवालानुसार, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये या देशांत चिंता, उदासपणा आणि संतापात वाढ झाली असल्याने सुबत्ता निर्देशांक आणखी खाली आला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत जगातील अनेक देशांमध्ये सुबत्ता येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
भारताला 4.01 टक्के गुण मिळाले आहेत. पाकिस्तानला 5.56 गुण मिळाले असून, यादीत पाकिस्तानचे स्थान 67 वे आहे. अहवालात भूतानला 5.08 गुणांसह 95 वे, नेपाळला 4.91 गुणांसह 100 वे, बांगलादेशला 4.45 गुणांसह 125 वे तर श्रीलंकेला 4.37 टक्के गुणांसह 130 वे स्थान मिळाले आहे. यादवी युद्ध आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानला 3.20 गुणांसह 154 वे म्हणजेच खालून तिसरे स्थान मिळाले आहे. सुबत्ता क्रमवारीत मालदीवचा समावेश करण्यात आलेला नाही. सर्वाधिक विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांपैकी अमेरिकेला 19 वे, ब्रिटनला 15 वे, जर्मनीला 17 वे, बेल्जियमला 18 वे तर फ्रान्सला 24 वे स्थान मिळाले आहे. परंतु उच्च दरडोई उत्पन्न आणि मानवी विकास निर्देशांक असणारा देश अशी ओळख असलेला जपान 2018 मध्ये 54 व्या स्थानी होता तर 2019 मध्ये त्याला 58 वा क्रमांक मिळाला आहे. याचा अर्थ अमेरिका आणि युरोपातील इतर देशांच्या तुलनेत जपानी लोकांना स्वतःचे जीवन सुखी असल्याचे वाटत नाही.
पाकिस्तान आणि जपान यांच्यात अवघ्या नऊ क्रमांकांचे अंतर आहे. यातून एक निष्कर्ष असा काढता येऊ शकतो की, पाकिस्तानात दरडोई उत्पन्न कमी असले आणि शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा खूपच तकलादू असल्या तरी सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाला आपण सुखी आहोत असे वाटते. 2018 मध्ये पाकिस्तान 75 व्या क्रमांकावर होता तर 2019 मध्ये तो 67 व्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तान संपूर्ण आशियातील सर्वाधिक सुखी देश आहे, एवढेच नव्हे तर चीनपेक्षाही तो अधिक सुखी आहे, हे भारतीयांना पटणारसुद्धा नाही. 2018 च्या क्रमवारीत चीनचा क्रमांक 87 वा होता तर 2019 मध्ये भारताप्रमाणेच चीनचेही स्थान घसरून 93 वर पोहोचले आहे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणारा देश असूनही चीन सुबत्तेच्या बाबतीत भूतानपेक्षाही दोन पायऱ्या खालीच आहे.
भारत 2025 पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहत असून, जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताला लौकिक हवा आहे. परंतु दुसरीकडे, सुखी जीवनाच्या बाबतीत भारताचे स्थान सातत्याने घसरत आहे, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून आपण अनेक विकासकामे आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्यांचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचा मोदी सरकारचा दावा आहे. तरीही जागतिक सुबत्ता क्रमवारीत भारताची घसरण का होत आहे, हा सरकारच्या अभ्यासाचा विषय असायला हवा.