नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीसंदर्भात ही बैठक होती, असे समजते आहे. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधील सुरक्षा विषयक आढावा या बैठकीत घेतला गेला असे जरी मानले जात् असले तरी बैठकीतील नेमका तपशील समजू शकलेला नाही.
गेल्या आठव्ड्यभरापासून जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने जम्मू काश्मीर प्रशासनाला केंद्राकडून विशेष सूचनाही करण्यात आल्या आहेत. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून पर्यटक आणि यात्रेकरूंना ततडीने काश्मीरमधून निघून जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात् घेऊन ही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत असल्याचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल सांगितले. जम्मू काश्मीर बाहेरील विद्यार्थी आणि “एनआयटी’ परीक्षेसाठी श्रीनगरमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या मूळ गावी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सर्व घडामोडींमुळे कलम “35 ए’ रद्द करण्याची केंद्राची हालचाल सुरू असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. जम्मू काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी या संभाव्य हालचालींना विरोध दर्शवला आहे.