-माधव विद्वांस
चारित्र्यसंपन्न कुशल राजकारणी, गुणांची पारख असणारे, साहित्यिक, जाणते प्रशासक, महाराष्ट्रपुत्र यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती.त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे त्यांचे काका आणि आई यांनी त्यांचे संगोपन केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रे येथे व माध्यमिक शिक्षण कराड येथे झाले. पुणे येथे लॉ कॉलेजमधून ते कायद्याची परीक्षा पास झाले. त्यांच्या मातोश्रींनी त्यांना आत्मनिर्भरता आणि देशभक्तीबद्दल शिकवले.त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भुरळ पडली होती.
सुरुवातीस ते व त्यांचे परममित्र लक्ष्मणशास्त्री जोशी डाव्या विचारसरणीच्या मानवेंद्र रॉय यांचे अनुयायी बनले. मात्र, त्यांनी नंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. “कृष्णाकाठ’ हे त्यांचे आत्मचरित्र. त्यातून त्यांच्या स्वभावाच्या तसेच वैचारिक पातळीची उंची लक्षात येते. यशवंतराव अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातून आले होते व त्यामुळे सामान्य माणसाची नाळ आयुष्यभर जोडलेली होती. वर्ष 1956मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मेनन यांनी संरक्षणमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव यांच्याकडे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण खाते सोपविले. युद्धानंतरची नाजूक परिस्थिती त्यांनी दृढतेने हाताळली आणि सैन्यदलाच्या सबलीकरणासाठी अनेक निर्णय घेतले आणि पंडित नेहरू यांच्यासह चीनशी शत्रुत्व संपवण्यासाठी बोलणी केली.
सप्टेंबर 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी लालबहादूर शास्त्री सरकारमध्ये संरक्षणखाते सांभाळले होते. केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या त्यांनी भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (1977-78) ते विरोधी पक्षनेते होते. चरणसिंग मंत्रिमंडळात त्यांनी उपपंतप्रधानपदही सांभाळले होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा वापर व प्रचार, तसेच कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी 18 सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेला चालना दिली. तसेच मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना केली. राजकारणी व्यक्ती म्हटले की गुणदोष दिसतातच, मतभेद, टीका आलीच पण या सर्वांच्या पलीकडे त्यांचे जीवन होते. सामन्यातून जन्मलेल्या या महान व्यक्तीचे अजातशत्रू असाच उल्लेख करावा लगेल. त्यांनी गुणग्राहकता राजकीय मतभेदापलीकडे जपली. भाषणांत व्यक्तिगत टीका तसेच पातळी कधीही सोडली नाही.
यशवंतराव चव्हाण यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यामध्ये आपले नवे मुंबई राज्य, ऋणानुबंध (ललित लेख), कृष्णाकाठ (आत्मचरित्र), भूमिका महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह), युगांतर, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा यांचा समावेश आहे. पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांचा मृत्यू 1 जून 1983 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जेमतेम सतरा महिन्यांनी यशवंतराव चव्हाण 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्ली येथे स्वर्गवासी झाले. त्यांचे पार्थिव कराड येथे नेण्यात आले.तेथे स्मृतिउद्यान उभे करण्यात आले आहे.