मुंबई – भारतात खाद्य तेलाचे दर अगोदरच वाढविण्यात झाल्यामुळे खाद्यतेलाची विक्री कमी झाली आहे. आता इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारतात आणखी खाद्यतेलाच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भारतामध्ये अगोदरच महागाईचा दर सात टक्क्याच्या जवळ आला असताना पाम तेलाच्या दरात वाढ होणार असल्यामुळे भारतातील महागाईचा दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंडोनेशियातील महागाईचा दर वाढला असल्यामुळे इंडोनेशियाने पाम तेलाचा पुरवठा वाढावा याकरिता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचा भारतावर थेट परिणाम होणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 50 टक्के पाम तेल इंडोनेशियातून आयात करीत असतो.
भारतातील खाद्यतेलाची बरीच गरज रशिया आणि युक्रेनमधून येणाऱ्या सूर्यफुलाच्या तेलावर भागविली जात होती. मात्र त्या दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू असल्यामुळे सूर्यफुलाच्या तेलाची आयात प्रचंड महाग होत असल्यामुळे भारत इंडोनेशियाकडून पाम तेलाची आयात वाढवीत असताना इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारताच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे. भारतात स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाचा वापर केला जातो. करोनानंतर भारतातील मध्यम वर्ग आणि गरिबांचे उत्पन्न कमी झाल्यामुळे त्यांना खाद्य तेलावर बराच खर्च करावा लागत असतानाच ही नवी अडचण भारतासमोर निर्माण झाली आहे.
यासंदर्भात विश्लेषकांनी सांतिले की कमीत कमी एक महिनाभर ही निर्यात बंदी चालू राहण्याची शक्यता आहे. कारण इंडोनेशियाला परकीय चलनाची बरीच गरज असल्यामुळे इंडोनेशिया फार काळ निर्यात बंदी अमलात आणू शकणार नाही. अर्जेंटिना या देशानेही मर्यादित काळासाठी सोयाबीन तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली असून फक्त निर्यात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. भारतातील खाद्य तेल उत्पादकांनी खाद्य तेलाच्या किमतीत आगोदरच सात टक्के वाढ केली आहेत. आता त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.