नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ केली जात आहे. मात्र भारतामध्ये अजूनही रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. महागाई रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे असे रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.व्याजदर वाढ म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य असे वर्णन काही राजकीय लोक करतात, ते चुकीचे आहे असे राजन यांनी सांगितले.
सध्या भारतात किरकोळ महागाई 6.95 टक्के तर घाऊक महागाई 14.55 टक्क्यांवर गेली आहे. अशा अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेने आपल्या व्याजदरात वाढ केली तर त्याचा फायदा परकीय गुंतवणूकदारांना होईल असा युक्तिवाद काही राज्यकर्ते करीत आहेत.
मात्र परदेशी गुंतवणूक भारतासाठी देशांतर्गत गुंतवणूकीइतकीच महत्त्वाची आहे असे राजन यांनी स्पष्ट केले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ केली नसली तरी लवकरच व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहे.