येवलेवाडी येथील कोपरासभेत आमदार सुरेश गोरे यांचे मत
महाळुंगे इंगळे -2014 च्या निवडणुकीनंतर तालुक्याचे नेतृत्व करताना अनेक रस्ते धुळीने माखलेले होते. काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचली नव्हती. अनेक गावांमध्ये पायपीट ठरलेलीच होती. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी खेड तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी 2014 पर्यंतही दुर्गम भागात जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे सर्वांत आधी त्या कामांना प्राधान्य देऊन पूर्णत्वास नेले. पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांच्या तालुक्यातील नातेवाईकांना आधार दिला. विकासकामे करताना तालुक्यातील विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आणि एमआयडीसीत शांतता आणि भयमुक्त तालुका करण्यात यशस्वी ठरलो, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांनी नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारादरम्यान येलवाडी येथे महायुतीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिसष सदस्य किरण मांजरे, अशोकराव खाडेभराड, जिल्हा उपप्रमुख शिवाजीराव वर्पे, जिल्हा परिषद सदस्या रुपाली कड, आरपीआय खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस, तालुक प्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, भाजप नेते रामहरी आवटे, नंदा कड, विश्वास बोत्रे, सरपंच हिराबाई बोत्रे, सरपंच सोनल बोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, खेड तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. हे 2014 च्या निवडणुकीनंतर केवळ वल्गनाच असल्याचे सिद्ध झाल्याने विरोधकांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही
हक्क नाही.
“जनताच चोख उत्तर देणार’
खेड तालुक्यात राष्ट्रवादीची साथ सामान्य कार्यकर्त्यांनी सोडली आहे, त्यांच्या सोबत आता केवळ ज्यांनी सामान्यांवर अन्याय केला तेच फिरत आहेत. खेड तालुक्याच्या निवडणूक प्रचाराच्या विरोधी उमेदवारांच्या समवेत सतत वावरणाऱ्यांवर गुन्हे असलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचा खरा चेहरा आताच समोर आला आहे. तथाकथिक सभ्यतेची भंपक पोपटपंची आणि व्हाईट कॉलर व भंपक बडबड करणाऱ्यांचा नेमका डाव मतदारांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत सुरु झालेल्या त्यांच्या दडपशाहीला जनताच चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार सुरेश गोरे यांनी नमूद केले.
खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत सामन्य नागरिकच काय विरोधी कार्यकर्त्यांनाही निर्भयपणे राहता यावे, याची कसोशीने काळजी घेतली. जनतेची सतत दिशाभूल करणारे माजी आमदार, गोर गरीब जनतेवर अन्याय करून गब्बर झालेले विरोधी उमेदवारांनी मतदानासाठी पांघरलेला सभ्यतेचा बुरखा जनताच टराटरा फाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– किरण मांजरे माजी सदस्य, जिल्हा परिषद