संजय राऊतांचा नाराज मंत्र्यांना सूचक सल्ला
मुंबई : राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचा अखेर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती होती. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र ते स्थान न मिळाल्याने, संजय राऊत हे नाराज झाल्याच्या बातम्यांनी यामुळे जोर धरला होता. त्यावरच संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत, ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. तिन्ही पक्षांमध्ये सक्षम लोक आहेत. आपल्या लोकांनी थोडा धीर धरायला हवा, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत ही आनंदाची बाब आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Shiv Sena’s Sanjay Raut on #MaharashtraCabinetExpansion: People should understand that we don’t have many options since it’s a govt of 3 parties,there are capable people in all 3 parties.Our people must stay a little patient. It’s a matter of happiness that Uddhav Thackeray is CM pic.twitter.com/iPZzkc7R5m
— ANI (@ANI) December 30, 2019
नाराज असल्याचे वृत्त आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने मी पक्षावर नाराज नाही. नाराजीचे काहीच कारण नाही. सत्ता स्थापन करण्यात आमचा वाटा आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे विलंब झाला. कॉंग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांना दिल्लीत जावे लागते. शिवसेना-राष्ट्रवादीचे निर्णय महाराष्ट्रातच होतात, असेही राऊत काल म्हणाले होते.
विधानभवनात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडला. एकूण 36 जणांचा शपथविधी झाला. यामध्ये 26 जणांनी कॅबिनेट तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आमदार अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.