नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांची आपल्या घराकडे परतण्यासाठी धडपडही सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात देखील अशाच प्रकारे दोन चिमुरडे मागील 45 दिवसांपासून आपल्या आजोळी अडकले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मदतीने अखेर या चिमुरड्यांची त्यांच्या आई-वडिलांशी भेट झाली.
मुळचे भिंगार येथील व हल्ली पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या सुरेखा आणि श्रीकांत तेली या दाम्पत्याला कियान आणि किमया अशी दोन मुले आहेत. हे दोघे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर या गावी आपल्या आजीकडे गेली होती. दरम्यान करोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. अवघा 6 वर्षांचा कियान आणि 9 वर्षांची किमया ही मुले आज-उद्या जाता येईल, म्हणत घरी जाण्याची वाट बघत होती. मात्र, दिवसामागून दिवस सरु लागले, तरी वाहतूक सुरू होईना. आधी 21 दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई-वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. इकडे आईचा जीवसुद्धा कासावीस झाला. मोबाईलवरुन एकमेकांशी संपर्क होत असला, तरी प्रत्यक्ष भेट घेऊन आईच्या कुशीत झेपावण्यासाठी मुलं अक्षरशः व्याकुळ झाली होती.
काहीच मार्गच दिसत नव्हता. त्यामुळे अखेर सुरेखा तेली यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर खा. सुळे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले 45 दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही चिमुरड्यांना पुण्यात आणण्याची परवानगी मिळाली.
आवश्यक परवानगी घेऊन कन्नड तालुक्यातून रवाना झालेली गाडी दोन्ही मुले घेऊन खराडी येथील तेली यांच्या घरी पोहोचली. दारात गाडी पोहोचताच मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. डोळ्यात अश्रू आणून सुरेखा तेली यांनी मुलांना कवटाळले आणि खासदार सुळे यांचे भरभरुन आभार मानले.