सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार मित्र वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून करत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता ते करत असलेले वार्तांकन कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
पत्रकारांचे जिल्हा प्रशासनाला सहकार्य आहे. ते यापुढेही असेच राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन गेले 40 ते 50 दिवस कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपायोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आहे.
करोना संसर्गाबाबत चांगल्या पद्धतीने जनजागृती केली आहे. पत्रकारांनी वार्तांकन करताना मास्क घालून बाहेर पडावे. सुरक्षित अंतर ठेवून वार्तांकन करावे. कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही सिंह यांनी केले आहे.