नगर – रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारावा, यासाठी शेतकरी आता पुन्हा शेणखताकडे वळू लागले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापिक होण्याचा धोका संभवतो.
पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतांमुळे पाण्याचे स्रोतही दूषित होतात. जमिनीतील कस टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूंना मारक ठरतात. शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.
शेणखताला भाव काय?
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शेणखताचे भाव वाढू लागले आहेत. सध्या चारचाकी ट्रॅक्टरच्या एका ट्रेलरला सहा ते साडेसहा हजार रुपये, तर दोनचाकी ट्रेलरला चार हजार रुपये शेणखताला भाव मिळत आहे.
शेणखतासाठी वेटिंग
शेणखताची टंचाई निर्माण होत आहे. त्या मागणी मोठी आहे. त्यामुळे ज्यांना शेणखत घ्यावे लागते. त्यांना जास्त पैसेही मोजावे लागतात. उन्हाळ्याच्या कालावधीत शेतकरी शेणखत शेतात टाकतात. त्यामुळे या काळात मागणीही वाढते. त्यामुळे खतासाठी वेटिंग करावी लागते.
शेणखत तयार कसे कराल?
गायी, म्हशी, शेळ्यांचे मलमूत्र, जनावरांनी खाऊन उरलेला चारा, आदी कुजवून त्यापासून शेणखत तयार केले जाते. शेतकरी बहुधा गोठ्याच्या जवळच एखादा मोठा खड्डा घेऊन त्यामध्ये जनावरांचे मलमूत्र म्हणजेच शेण टाकतात. काही जण त्यामध्ये जनावरांनी खाऊन उरलेला चाराही टाकता. तो कुजल्यानंतर त्याचा वापर शेणखत म्हणून केला जातो.