खेड – राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस सध्या मोडकळीस आल्या असून, या मोडकळीस आलेल्या वेगवेगळ्या आगाराच्या बस कर्जत-बारामती राज्यमार्गावर नादुरुस्त अवस्थेत आढळून येत आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी बसेसचे ब्रेक फेल होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.
खेड (ता. कर्जत) येथे नादुरुस्त उभ्या असलेल्या बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसच्या धक्क्याने नुकताच खेड येथील बदामबाई शेटे या महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. बसचालक आणि वाहकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरील छोटे-मोठे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या प्रत्येक गावाच्या यात्रा-जत्रा, लग्न समारंभ आदींमुळे बससेवेवर वाहतुकीचा बोजा वाढला आहे.
त्यातच महिलांना प्रवासी भाड्यात शिंदे-फडणवीस सरकारने पन्नास टक्क्यांची सवलत दिल्यामुळे महिलांच्या गर्दीने बस खचाखच भरलेल्या दिसून येत आहेत. असे असले तरी अनेक बस निकामी झाल्या आहेत. काही गाड्यांची अवस्था तर खूपच खराब झाली आहे. सुमारे 80 टक्के बस जुन्याच आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या बसेस रस्त्यावरच बंद पडत आहेत.
जुन्या बसेसमुळे प्रदूषणासह ध्वनिप्रदूषणही वाढले आहे. अनेक बसेसचे पत्रे निखळलेल्या स्वरूपात आहेत. टायर रिमोल्ड स्वरूपातील वापरण्यात येत आहेत. काही वेळा या टायरमधील तारा बाहेर आल्याने भर रस्त्यात टायर फुटून मोठे अपघात होत आहेत. या सर्व बाबींचा परिणाम प्रवाशांवरदेखील होत आहे.
बस रस्त्यावर अचानक नादुरुस्त होत असल्याने बसमधून प्रवास करणाऱ्यांचेही हाल वाढले आहेत. तासन्तास रस्त्यावरच प्रवाशांना अडकून पडावे लागते. यामुळे बसचे वेळापत्रकही कोलमडत आहे. अनेकांच्या जीवावर बेतलेल्या या बससेवेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नादुरुस्त बससेवेमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि नादुरुस्त बसेसमुळे अपघात होत असतील तर ही खरोखरच खेदाची बाब आहे, असे अमृता वाघमारे सरपंच (खेड, ता.कर्जत) म्हणाल्या.