राजगुरूनगर, {रामचंद्र सोनवणे} – रासायनिक खतांचा वापर करून जास्त कांद्याचे जास्ती जास्त उत्पन्न मिळवण्याचे शेतकरी नेहमीच प्रयत्न करीत असतो. त्यातच कांद्याला मुबलक बाजारभाव मिळत नाही असे असताना खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथील शेतकरी बाळासाहेब विठोबा गाडे यांनी माळरानावर एक एकर क्षेत्रात सेंद्रीय शेती पद्धतीने कांद्याची शेती फुलवली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून गाडे यांनी जैविक पद्धतीने कांद्याची लागवड करत आहे. कांदा उत्पादित करण्यासाठी कुठल्याच प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके तसेच रासायनिक खतांचा वापर ते करीत नाहीत. जैविक खतांमध्ये त्यांनी चांगल्या प्रतीचे जुने कुजलेले शेणखत, गोमूत्र आदी नैसर्गिक खतांचा वापर केला आहे. एक एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने कांदा लागवड केली आहे. कांदा पिकाची ते निगा राखत आहेत.
नियमित उत्पादनाच्या तुलनेत सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या कांद्याचे उत्पादन कमी मिळत असले तरी मात्र चव, गुणवत्ता व प्रतवारी चांगली असल्याने त्यांच्या कांदा पिकांला चांगला बाजारभाव मिळत आहे. यावेळीही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्ती केला आहे. अनेक व्यापारी थेट बांधावर येऊन कांदा खरेदी करत असल्याचे शेतकरी गाडे यांनी सांगितले.
तीन महिने कांदा विक्री
शेतात एक पत्रा शेड उभारून तार जाळी वर्तुळाकार गोल कणगीत कांदा साठवून ठेवतात त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता, प्रतवारी चांगली राहते. जुलै, ऑगस्ट महिन्यात कांदा विक्री करत असल्याचे शेतकरी गाडे सांगतात.
बाळासाहेब गाडे गेल्या काही वर्षापासून ऑरगॅनिक औषधे खते वापरून यशस्वी कांदा उत्पादन घेत आहे. कांदा खाण्यासाठी ही अतिशय चविष्ट असून रासायनिक प्रक्रिया न केल्यामुळे तो दीर्घकाळ टिकतो. कांद्याचे आगर असलेल्या खेड तालुक्यात सेंद्रीय पद्धतीने शेतकर्यांनी कांदा लागवड ही काळाची गरज आहे.- सोमनाथ टोपे, प्रगतशील शेतकरी