पारनेर, (प्रतिनिधी) – रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेकी वापरामुळे आपले जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी होत असून उत्पादकता घटत चालली आहे. कॅन्सरसारख्या दुग्धर आजाराचे प्रमाण वाढले आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी विविध सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी केले.
कासारे येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील शेतकरी गटांच्या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान ते बोलत होते. पारनेर तालुक्यातील किन्ही येथील सेंद्रिय शेती पद्धतीचा स्वतः अवलंब करणारे प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब ठाणगे यांनी सेंद्रिय खतांची निर्मिती व वापर याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करत शेती पद्धतीविषयी माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी महेश बनकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करून बायोडायनेमिक व कंपोस्ट खत पद्धती व शेणखत कुजविणारे जिवाणू कल्चरचा वापर याबाबत प्रात्यक्षिके करून दाखविले. पाणी फाउंडेशनचे विक्रम फाटक यांनी पाणी चळवळ, वॉटर कप स्पर्धा व त्यामध्ये शेतकरी व महिला बचत गटांनी सहभागी होण्याबाबत आवाहन केले.
यावेळी पारनेर तालुका कृषी अधिकारी गजानन घुले, मंडळ कृषी अधिकारी महेश बनकर, पर्यवेक्षक सोपानराव शिंदे, कृषी पर्यवेक्षक आशिष दिवटे, तिखोल येथील शेतकरी बाळासाहेब ठणगे, आत्मा विभाग पारनेर देवेंद्र जाधव उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच शिवाजीराव निमसे यांनी केले. आभार पाणी फाऊंडेशनचे विक्रम फाटक यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.