मुंबई – करोनाचा धोका कमी झाल्यावर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक आहे, असे मत भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केले आहे. तसेच अमिरातीत महिलांच्या चार संघात टी-20 चॅलेंज स्पर्धा होत असून त्यातही खेळण्यासाठी आतूर बनले असल्याचेही तिने सांगितले.
अमिरातीत आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धाही होईल, असा विश्वास वाटला. चॅलेंज स्पर्धा ही महिलांच्या आयपीएलची रंगीत तालीम ठरेल. यंदा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत निर्णय घेतल्यामुळे सर्व खेळाडू आनंदात आहेत. आता नोव्हेंबरमध्ये आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच ही चॅलेंज स्पर्धा होत असल्याने पाठिंबाही चांगला मिळेल, असा विश्वासही हरमनने व्यक्त केला.
आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. तर महिलांची चॅलेंज स्पर्धा 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मूळ आयपीएलला जो पाठिंबा मिळेल त्यातूनच महिलांच्या स्पर्धेकडेही प्रेक्षक वळतील. अशी स्पर्धा निश्चितच यशस्वी होइल व त्यानंतर महिलांच्याही आयपीएल स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.